धार्मिक आस्थांचं पालन घराच्या उंबरठ्याच्या आत करा; अजितदादांचा पोलिसांना कानमंत्र

| Updated on: Mar 30, 2021 | 2:12 PM

तुमची बांधिलकी भारतीय राज्यघटनेशी, नियम व कायद्यांशी असली पाहिजे. (ajit pawar at convocation ceremony of Police academy in Nashik)

धार्मिक आस्थांचं पालन घराच्या उंबरठ्याच्या आत करा; अजितदादांचा पोलिसांना कानमंत्र
अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
Follow us on

नाशिक: तुमची बांधिलकी भारतीय राज्यघटनेशी, नियम व कायद्यांशी असली पाहिजे. जात-पात, धर्म-पंथ, वैचारिक बांधिलकी, राजकीय-सामाजिक-धार्मिक विचारसरणी या गोष्टींना वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात स्थान असणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. याउपरही वैयक्तिक आस्थांचं पालान करायचं असेल तर ते घराच्या उंबरठ्याच्या आत करा, वैयक्तिक आस्थांचं प्रदर्शन टाळा, यातूनच देश पुढे जाण्यास मदत होणार आहे, असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. (ajit pawar at convocation ceremony of Police academy in Nashik)

तोपर्यंत खांद्यावरील स्टारना अर्थ

महाराष्ट्र पोलीस अकॅडमीतील प्रशिक्षणार्थी पोलीस उप निरीक्षक ११८ व्या सत्राच्या च्या दीक्षांत संचलन समारंभाच्या प्रसंगी दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे आवाहन केलं. अजितदादांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे पोलिस उपनिरीक्षकांशी संवाद साधला. पोलिस उपनिरिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत असताना नियमानं, कायद्यांनं वागा. परंतु, कायदा पाळताना, तुमच्यातली माणुसकीची, बंधुत्वाची भावना हरवू नका. तुम्ही घातलेल्या खाकी वर्दीच्या आत, जोपर्यंत माणुसकी जिवंत आहे, तोपर्यंतच तुमच्या खांद्यावरच्या स्टारना किंमत आहे. हे कायम लक्षात ठेवा, असं पवार म्हणाले.

पवारांचा कानमंत्र

मला आनंद आहे की, आपल्यापैकी अनेक जण शेतकरी, कष्टकरी, मध्यमवर्गीय, सामान्य कुटुंबातून आला आहात. शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, सामान्य माणसाची दु:ख, अडचणी काय असतात हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. रोज कष्ट करुन रोजंदारीवर पोट भरणाऱ्या लोकांच्या वेळेचं, श्रमाचं मोल तुम्ही समजलं पाहिजे. ही सामाजिक जाणीव तुमच्याकडे असेल तरंच, पोलिस स्टेशनमध्ये मदतीसाठी आलेल्या सामान्य माणसाला तुम्ही न्याय देऊ शकाल. तुम्ही पोलिसांचे, शासनाचे प्रतिनिधी म्हणून समाजात वावरणार आहात. समाजातील सामान्य माणसाशी तुमचा संबंध येणार आहे. या सामान्य माणसाशी तुम्ही कसे बोलता, त्यांच्याशी कसे वागता, त्याच्या प्रश्नांकडे कसे बघता, ते कसे सोडवता, यावरंच तुमची, तुमच्या वरिष्ठांची आणि शासनाची प्रतिमा तयार होत असते, असंही त्यांनी सांगितलं.

सामान्यांना न्याय द्या

पोलिस स्टेशनमध्ये न्याय मागण्यासाठी येणाऱ्या, सामान्य माणसांचे प्रश्न तुमच्यासाठी किरकोळ किंवा तुम्हाला लहान वाटले, तरी सामान्य माणसासाठी, त्याच्या कुटुंबासाठी ते प्रश्न खुप मोठे असतात. या सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याचा तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. सगळेच प्रश्न कायद्याने, नियमाने सुटतात असं नाही, परंतु माणुसकीच्या भावनेतून अनेक प्रश्न सोडवले जावू शकतात, या सकारात्मक विचारातून तुम्ही काम केलं पाहिजे, असं सांगतानाच आपण सर्व पदवी आणि पदवीपेक्षा अधिक शिक्षण घेतलेले आहात. एमपीएससी परीक्षा पास होऊन पोलिस सेवेत आला आहात. या यशामागे अनेक वर्षांचे कष्ट, मेहनत, परिश्रम आहेत. संयमही मोठा आहे. त्याबद्दल तुमचं कौतुक आहे. परंतु, हे यश तुमच्या एकट्याचं नाही, तुमचे आई-वडिल, बहिण-भाऊ, मित्र-मैत्रिणी, शिक्षक, शेजारी, सहकारी, समाजाचं या यशात योगदान आहे, तुमच्या यशामागे अनेकांचा त्याग आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे समाजाला जेव्हा जेव्हा तुमची मदत लागेल, तेव्हा तेव्हा ती देऊन, समाजाच्या ऋणाची परतफेड करण्याचं कर्तव्य तुम्ही पार पाडाल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (ajit pawar at convocation ceremony of Police academy in Nashik)

 

संबंधित बातम्या:

बारामतीत डिपॉझिट जप्त, तरीही मी आमदार झालो, समाधान आवताडेही होईल : गोपीचंद पडळकर

माणसाच्या जीवापेक्षा काहीही मोठं नाही, लॉकडाऊनच्या प्रश्नावर राजेश टोपेंची ‘सीधी बात’

फिल्मी पोलीस आणि खऱ्या पोलिसांमध्ये फरक असतो, जमिनीवर राहा, नव्या PSI ना मुख्यमंत्र्यांचा रोखठोक सल्ला

(ajit pawar at convocation ceremony of Police academy in Nashik)