फडणवीस-अजित पवार शपथविधीवर पवारांचा गौप्यस्फोट, आता अजितदादा खाडकन म्हणाले…

| Updated on: Dec 30, 2021 | 1:47 PM

अजित पवार म्हणाले, जोपर्यंत कोरोनाचं संकट टळत नाही, तोपर्यंत महापालिका निवडणुका घेऊ नयेत, असं एकमताने निवडणूक आयोगाला आवाहन केले आहे.

फडणवीस-अजित पवार शपथविधीवर पवारांचा गौप्यस्फोट, आता अजितदादा खाडकन म्हणाले...
Sharad Pawar, Ajit Pawar
Follow us on

मुंबईः 23 नोव्हेंबर 2019 रोजी अगदी भल्यापहाटे केलेला शपथविधी अजूनही राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांची पाठ सोडायला तयार नाही. त्यावर आज शरद पवारांनी पहिल्यांदाच मत व्यक्त करत यामागे आपला हात नसल्याचे सांगितले. या प्रतिक्रियेवर अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी त्रागा करत उत्तर देणे टाळले.

काय म्हणाले शरद पवार?

अवघा महाराष्ट्र साखरझोपेत असताना 23 नोव्हेंबर 2019 रोजी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. राजभवनात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. पण फडणवीस आणि अजितदादांची खेळी फार काळ टिकाव धरू शकली नाही. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीसांसोबतच्या शपथविधीसाठी अजित पवारांना मी पाठवलं असं म्हणतात हे खरं आहे. पण मी पाठवलं असतं, तर तिथे राज्यच बनवलं असतं. असं अर्धवट काही काम केलं नसतं. याच्यात काहीही अर्थ नाही. त्यात दुसऱ्या काही गोष्टी आहेत, असा सूचक उल्लेख पवारांनी यावेळी केला. मात्र, त्यात दुसऱ्या गोष्टी कोणत्या होत्या, हे काही त्यांनी सांगितलं नाही.

काय म्हणाले अजितदादा?

शरद पवारांच्या प्रतिक्रियेवर साहजिकच पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी आपला त्रागा व्यक्त केला. ते म्हणाले, भाजप राष्ट्रवादी सरकार स्थापनेबाबत मला बोलायचे नाही. मला जेव्हा बोलायचे आहे त्यावेळेस बोलेन. पक्षातील जेष्ठ व्यक्ती एकदा बोलल्यावर मी त्यावर काही बोलणार नाही, असे म्हणत त्यांनी काढता पाय घेतला. त्यापूर्वी, जोपर्यंत कोरोनाचं संकट टळत नाही, तोपर्यंत महापालिका निवडणुका घेऊ नयेत, असं एकमताने निवडणूक आयोगाला आवाहन केल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. शिवाय, महात्मा गांधींबद्दल बोलणं योग्य नाही. एकमेकांबद्दल आदर पाळला पाहिजे. आपण बोलताना तारतम्य पाळलं पाहिजे. जर कोणी चुकीच बोललं तर त्याला कायदा आहे, अशा इशाराही त्यांनी दिला.

जनतेला आवाहन
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाढत्या कोरोना रुग्णांबद्दल चिंता व्यक्त करून जनतेला आवाहन केले. ते म्हणाले, सर्वांनीच कोरोनाचे नियम पाळावेत. मास्क आवश्य वापरावा. लसीचे दोन्ही डोस प्रत्येकाने घ्यावेत. घरी राहून नवीन वर्षांचे स्वागत करा. एका प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, सगळीकडे उदघाटन आणि कार्यक्रम असतात. मात्र, प्रत्येक कार्यक्रमाला जाणे शक्य होत नाही. आम्ही बाहेर पडलो तरी चर्चा होते. नाही पडलो तरी चर्चा होते. मात्र, सध्या थंडी आहे. थंडीत कोरोनाचा संसर्ग वाढतो. मुंबईत रुग्ण वाढत आहेत. सर्वांनी काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी केले.

इतर बातम्याः

Chandrakant Patil | पवारांनी मोदींच्या ऑफरबद्दल सांगितलं, आता चंद्रकांत पाटलांनी पवारांचा इतिहासच काढला, म्हणाले…

Nashik|मुलगा सैन्यात म्हणून सेवानिवृत्त जवानाने गावजेवण दिले; इकडे तोतया लष्करी अधिकाऱ्याने बेरोजगारांसह पत्नीलाही गंडवले