Ajit Pawar Passes Away : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे आज मुंबईत शाळा आणि कार्यालयांना शासकीय सुट्टी जाहीर

Ajit Pawar Death : अजित पवार यांचे बारामतीत झालेल्या विमान अपघातात निधन झाले आहे. आज सकाळी 9 च्या सुमारात हा अपघात झाला. अजित पवार यांच्या निधनामुळे आज मुंबईत शाळा आणि कार्यालयांना शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Ajit Pawar Passes Away : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे आज मुंबईत शाळा आणि कार्यालयांना शासकीय सुट्टी जाहीर
Ajit Pawar and Mumbai
Image Credit source: Google
| Updated on: Jan 28, 2026 | 3:18 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत झालेल्या विमान अपघातात निधन झाले आहे. आज सकाळी 9 च्या सुमारात हा अपघात झाला. बारामती विमानतळापासून अवघ्या काही अंतरावर त्यांचे विमान कोसळले. अजित दादांच्या निधनामुळे महाराष्ट्र महाराष्ट्र सुन्न झाला आहे. अजित दादांच्या अकाली निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. राज्यासह देशातील प्रमुख नेत्यांनी अजित दादांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 3 दिवस शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे आज मुंबईत शाळा आणि कार्यालयांना शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबईत सार्वजनिक सुट्टी जाहीर

मुंबई महानगर पालिकेने एक परिपत्रक जारी करत सुट्टीची घोषणा केली आहे. बीएमसीने आपल्या परिपत्रकात म्हटले की, अजित आशाताई अनंतराव पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या दुःखद निधनामुळे सर्व शासकीय कार्यालयांना बुधवार दि.28 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयातील अत्यावश्यक सेवा वगळून कामगार/कर्मचाऱ्यांना 28 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सु‌ट्टी राहील.

राज्यात शासकीय सुट्टी जाहीर

अजित पवार यांच्या निधनामुळे आज राज्यात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘राज्यात आज शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. त्यासोबत तीन दिवसाचा दिखवटा जाहीर करण्यात आला आहे. कधीही भरून न निघणारं असं नुकसान आहे. महाराष्ट्रातून असे लोकनेते गेल्यावर जी पोकळी तयार होते ती भरून काढणं अतिशय कठिण आहे. अजितदादा गेले यावर विश्वास ठेवायलाच मन तयार होत नाही. कारण अजित पवार हे जनतेच्या प्रश्नांसाठी सतत कार्यरत असायचे. लोकांमध्ये त्यांचा वावर असायचा.’

दमदार आणि दिलदार मित्र गेला

अजित पवारांच्या निधनावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अजित पवार महाराष्ट्राचे लोकनेते होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेले, महाराष्ट्रातील प्रश्नांची जाण असलेला नेता होता. त्यांच्याबद्दल जनसमान्यांमध्ये प्रचंड मोठी आस्था होती. अजितदादा अतिशय संवेदनशील नेतृत्व होतं. अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. ज्यावेळी ते महाराष्ट्राच्या विकासात अतिशय महत्त्वपूर्ण योगदान ते देत होते, त्यावेळी त्यांचं जाणं धक्कादायक आणि अविश्वसनीय आहे. माझ्यासाठी वैयक्तिक दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला आहे.