Ajit Pawar Plane Crash : 5 की 6, विमानात नक्की किती लोक होते? उज्ज्वल निकम यांनी स्पष्टच सांगितलं

अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सुरू असलेल्या तर्कवितर्कांवर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे. पुराव्याविना घातपाताचा संशय व्यक्त करणे चुकीचे असल्याचे सांगत, त्यांनी जस्टिस लोया यांच्या मृत्यूबाबत केले जाणारे दावे देखील पुराव्यांच्या आधारे खोडून काढले आहेत.

Ajit Pawar Plane Crash : 5 की 6, विमानात नक्की किती लोक होते? उज्ज्वल निकम यांनी स्पष्टच सांगितलं
ajit pawar 1
| Updated on: Feb 02, 2026 | 12:46 PM

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात निधन झाले. यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अजित पवारांचा मृत्यू घातपात आहे, असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यातच आता ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि खासदार उज्ज्वल निकम यांनी अत्यंत कडक शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. यावेळी उज्जवल निकम यांनी अजित पवारांशी संबंधित विमान अपघात आणि जस्टिस लोया यांच्या मृत्यूबाबत केले जाणारे दावे पुराव्यांच्या आधारे खोडून काढले आहेत.

त्या विमानात ६ प्रवासी होते

अजित पवारांच्या विमानाचा जो अपघात झाला, त्यावरून सध्या अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. यावर उज्ज्वल निकम म्हणाले की, “विमानाने प्रवास करताना प्रत्येक गोष्टीची नोंद असते. एखाद्या खासगी विमानाने प्रवास केला जातो, तेव्हा विमान प्राधिकरणाच्या (Aviation Authorities) अधिकाऱ्यांकडे त्याची रीतसर नोंद असते. मात्र, त्या विमानात ६ प्रवासी होते, असा कोणताही अधिकृत पुरावा आजवर समोर आलेला नाही.”

वेगळी कलाटणी देणे चुकीचे

विमानात इंधनाचा साठा मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे आग लागल्यानंतर मृतदेह पूर्णपणे जळून खाक झाले होते. जर कोणी यामागे कट (Conspiracy) असल्याचे म्हणत असेल, तर कायद्यानुसार तो सिद्ध करण्यासाठी ठोस पुराव्याची गरज असते. केवळ संशय व्यक्त करून एखाद्याच्या निधनासारख्या गंभीर विषयाला वेगळी कलाटणी देणे चुकीचे आहे, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले.

तसेच खासदार संजय राऊत यांनी जस्टिस लोया यांच्या मृत्यूबाबत पुन्हा एकदा शंका उपस्थित केल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी वस्तुस्थिती मांडली. जस्टिस लोया हे एका लग्नकार्यासाठी नागपूरला गेले होते. त्या रात्री त्यांच्यासोबत जे इतर न्यायाधीश उपस्थित होते, त्यांच्याशी मी स्वतः वैयक्तिकरित्या बोललो होतो. त्यांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानेच झाला होता. परंतु, अशा संवेदनशील विषयावर राजकारण करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले.

अपघात कसा झाला?

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार हे बुधवारी सकाळी ८.१० च्या दरम्यान मुंबई विमानतळावरुन बारामतीच्या सभेसाठी निघाले होते. अजित पवारांचे विमान हे बारामती विमानतळाजवळ पोहोचले, पण बुधवारी लँडिंगच्या वेळी दृश्यमानता (Visibility) अत्यंत कमी होती. विमानतळावर सुरक्षित लँडिंगसाठी किमान ५ किलोमीटर दृश्यमानतेची गरज असते, मात्र अपघाताच्या वेळी ती केवळ ३ किलोमीटर इतकी होती. यामुळे वैमानिकाने सुरुवातीचे लँडिंग रद्द करून विमान पुन्हा हवेत वळवण्याचा (Go-around) प्रयत्न केला, मात्र त्याच दरम्यान हा भीषण अपघात घडला. या अपघातानंतर विमान कंपनीसोबतच बारामती विमानतळाबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.