अजित पवारांचा मुख्यमंत्रीपदासाठी कोणाला पाठिंबा? दिल्लीत पाठवला संदेश

महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न अजूनही कायम आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेंस कायम आहे. एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री बनवावं म्हणून शिवसेनेच्या नेत्यांची मागणी आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असं भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. पण अजित पवार यांचा पाठिंबा कोणाला आहे जाणून घेऊयात.

अजित पवारांचा मुख्यमंत्रीपदासाठी कोणाला पाठिंबा? दिल्लीत पाठवला संदेश
mahayuti
shailesh musale | Updated on: Nov 25, 2024 | 9:18 PM

Maharashtra CM : महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेंस अद्याप कायम आहे. दिल्लीत भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाची बैठक होणार आहे. ज्यामध्ये महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय घेतला जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांनी भाजपच्या मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा दिला आहे. दिल्लीतील भाजपच्या हायकमांडलाही त्यांनी याबाबत संदेश पाठवला आहे. एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री झाले तर प्रादेशिक पक्ष म्हणून राष्ट्रवादीचे नेते म्हणजेच अजित पवार यांच्या पक्षावर दबाव निर्माण होऊ शकतो.

मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील दिल्लीला रवाना होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्ली हायकमांड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात फोनवर देखील चर्चा सुरू आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर या महापालिकांचा विचार करून देखील मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतला जाईल असं म्हटलं जात आहे.

अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना सांगितले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबाबत कोणत्याही फॉर्म्युल्यावर अद्याप चर्चा झालेली नाही. हा निर्णय दिल्लीतच घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पुढच्या वर्षी 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे त्यांच्या जवळचा व्यक्ती मुख्यमंत्रीपदी नियुक्त करणे आरएसएसची इच्छा असेल. निवडणूक निकालानंतर फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचीही भेट घेतली होती.

सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात दोन उपमुख्यमंत्री असतील. अजित पवार यांनी भाजपचा मुख्यमंत्री होण्यास संमती दर्शवली आहे, याचा अर्थ ते निश्चितपणे उपमुख्यमंत्री होणार आहेत. भाजपचा मुख्यमंत्री झाल्यास एकनाथ शिंदे यांचे काय होणार हा देखील मोठा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय असेल?

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाले आहे. महायुतीच्या 230 जागा निवडून आल्या आहे. भाजपचा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपच्या १३२ जागा निवडून आल्या आहेत. शिवसेनेच्या ५७ जागा निवडून आल्या आहेत तर राष्ट्रवादीच्या ४१ जागा निवडून आल्या आहेत.

Follow Us