पंतप्रधान मोदींच्या भेटीचा उद्देश काय? बैठकाआधीच खासदार बजरंग सोनवणे यांचं महत्त्वाचं भाष्य
राष्ट्रवादीचे 8 खासदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. या भेटीच्या उद्देशावर खासदार बजरंग सोनवणे यांनी महत्वाचं भाष्य केलं.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. दिल्ली दरबारी 11 वाजता भेट होणार आहे. या भेटीत राष्ट्रवादीचे 8 खासदार हे पंतप्रधान मोदींशी मतदारसंघातील प्रश्नांवर चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. परंतु या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे डिलीमिटेशनवरून शरद पवारांचे खासदार एनडीएला पाठिंबा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. परंतु या सर्व चर्चा खासदार बजरंग सोनवणे यांनी फेटाळून लावल्या आहेत. पंतप्रधान मोदींशी मतदारसंघातील प्रश्नांवर चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदींच्या भेटीआधी खासदार बजरंग सोनवणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खासदार बजरंग सोनवणे म्हणाले, ‘सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मराठवाडा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. पाणी नाही. पाऊस नसल्याने नदीतही पाणी नाही. जवळपास 50 टक्के वेळ पावसाळ्याचा निघून गेला आहे. तरीही अद्याप पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खास निधीची मागणी करणे आणि चर्चा करणे, हा विषय आहे’.
‘दुसरा विषय म्हणजे बीज आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकविमा मिळालेला नाही. शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा विषय असतो. दरवर्षी मिळत असतो. परंतु मागच्या वर्षी मिळाला नाही. मागच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जाहीर करण्यात आलेले अनुदान मिळालं नाही. मुख्यमंत्र्यांनी हे अनुदान जाहीर केले होते. त्यानंतरही अनुदान मिळालं नाही. हे तीन विषय अतिशय महत्त्वाचे आहेत. प्रत्येकाच्या मतदारसंघातील वेगवेगळे प्रश्न आहेत. ही औपचारिक आहे. या भेटीला दुसरा कोणताही अर्थ नाही, असं म्हणत बजरंग सोनवणे यांनी राजकीय चर्चा फेटाळून लावल्या.
रोहित पवार काय म्हणाले होते?
खासदारांच्या भेटीवर रोहित पवार यांनीही भाष्य केलं. खासदार रोहित पवार म्हणाले, ‘राष्ट्रवादीचे खासदार उद्या जाऊन भेटणार आहेत. पंतप्रधान मोदींची भेट घेऊन कामे करून घेतील. खासदार शेतकऱ्यांशी संबंधित कामे करून घेतील. त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न आहेत, अशी माहिती पक्षश्रेष्ठींकडून मिळाली आहे’. याचवेळी त्यांनी राष्ट्रवादीचे खासदार एनडीएच्या विधेयकाला पाठिंबा देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
