कुपोषणचा प्रश्न गंभीर! 150 दिवसांत तब्बल 110 चिमुकल्यांचा मृत्यू, एकट्या ऑगस्ट महिन्यात ‘इतके’ बळी
Malnutrition in Maharashtra : ऑगस्ट महिन्यातील चिमुकल्यांच्या मृत्यूची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यातील 19 बालकांचा मृत्यू धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात झाल्याचं समोर आलंय.
सुरेंद्रकुमार आकोडे, प्रतिनिधी, अमरावती : गेल्या अनेक वर्षांपासून अमरावतीच्या मेळघाटमध्ये (Melghat Malnutrition) कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. आता समोर आलेल्या आकडेवारीने या प्रश्नाची दाहकता पुन्हा एकदा अधोरेखित केलीय. गेल्या 5 महिन्यात तब्बल 110 चिमुकल्यांचा मेळघाटमध्ये मृत्यू झालाय. तर एकट्या ऑगस्ट (August 2022) महिन्यात 36 बालकं दगावलीत. कुपोषणासह विविध आजारांमुळे या मुलांचा मृत्यू (Children Death) झालाय.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यात एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात दोन मातांसह 0-6 वर्ष वयोगटातील 77 आणि 33 उपजत अशा 110 बालकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या पाच महिन्यात 2525 बाळांचा जन्म मेळघाटमध्ये झाला. त्यापेकी 36 बाळांचा मृत्यू एकट्या ऑगस्ट महिन्यात झाल्यानं चिंता व्यक्त केली जातेय.
पाहा ताज्या घडामोडी : Video
ऑगस्ट महिन्यातील चिमुकल्यांच्या मृत्यूची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यातील 19 बालकांचा मृत्यू धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे आदिवासी बांधवांनी लहान मुलांना उपचार कुठे करायचे, असा प्रश्न निर्माण झालाय.
कुपोषणाच्या तीव्र श्रेणीमध्ये 232 बालकं आहेत. असं असताना 14 ब गट डॉक्टरांसाह कर्मचाऱ्यांची अनेक पदं रिक्त असल्यानंही संताप व्यक्त केला जातोय. तोकड्या आरोग्य यंत्रणेचा फटका चिमुकल्यांना बसतोय. ज्या चिमुकल्यांचा उपचारामुळे जीव वाचवणं शक्य आहे, अशांना योग्य वेळी आरोग्य सेवेची मदत न मिळाल्यानं त्यांनाही प्राण गमावावे लागत असल्याचं समोर आलेल्या आकडेवारीतून अधोरेखित झालंय.
मेळघाटातील आदिवासी बालकांच्या कुपोषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होतोय. राज्य आणि केंद्र सरकार विविध योजना आखतंय, न्यायालय ताशेरे ओढतंय, पण तरिही कुपोषित बालकांच्या मृत्यूची आकडेवारी कमी होत नसल्याचं वारंवार समोर आलंय. एप्रिल ते ऑगस्ट महिन्याच्या 150 दिवसात एकूण 110 मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू ऑगस्ट महिन्यात झाल्यानं सवालही उपस्थित केले जातायत. पावसाळ्यात साथीचे रोग आणि जलजन्य रोगांचा प्रादुर्भावामुळे ही आकडेवारी वाढली असण्याचा अंदाजही तज्ज्ञांनी वर्तवला आहे.