‘तुम्हाला माझ्या मायची शपथ सांगतो…’, बच्चू कडू यांचं कार्यकर्त्यांना कळकळीचं आवाहन

| Updated on: Apr 03, 2024 | 3:55 PM

आमदार बच्चू कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आज कळकळीची विनंती केली. लोकसभा निवडणुकीत आपल्या प्रहार पक्षाच्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी काय-काय करावं लागेल, याबाबत बच्चू कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांना काही महत्त्त्वाच्या सूचना दिल्या.

तुम्हाला माझ्या मायची शपथ सांगतो..., बच्चू कडू यांचं कार्यकर्त्यांना कळकळीचं आवाहन
आमदार बच्चू कडू
Follow us on

आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे लोकसभेचे उमेदवार दिनेश बुब यांनी आज अमरावती मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर प्रहार पक्षाकडून अमरावती भव्य रॅली काढण्यात आली. यानंतर सभेचं आयोजन केलं. या सभेत बच्चू कडू यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर निशाणा साधला. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती देखील केली. “कार्यकर्ते स्वत:चे पैसे खर्च करुन इथे आले, हीच तर प्रहारची ताकद आहे. पण आता झोपू नका. जपून राहा. आता झोप उडवायचे दिवस आहेत. 20 दिवस… आता नाही तर कधी नाही. आता हार घेतली तर पुन्हा पैसेवाल्याची जीत होणार. पुन्हा नेतेवाल्यांची जीत होणार. सामान्य माणसं धुळीत टाकणार. पुन्हा लोकशाही पैशांच्या समोर झुकून टाकणार”, असं बच्चू कडू म्हणाले.

“तुम्हाला माझ्या मायची शपथ सांगतो, रोज पाच-सहा गाव फिरले पाहिजेत. खिशातले पाचशे ते हजार रुपये खर्च केल्याशिवाय भाऊ ही निवडणूक जिंकू शकत नाही. समोर 500 कोटीचा मालक आहे, त्याच्यासमोर आम्हाला लढायचं आहे. हे पक्ष त्यांच्या पंगतीत बसलेले आहेत. ती पंगत मला तोडायची आहे. त्यासाठी तुम्ही थोडी हयगय केली, फोन केला आणि बच्चू भाऊ गाडी पाठवू का? सांगा, ही दिलदारी दाखवावी लागेल. अमरावतीकरांसाठी 26 दिवस, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, जात काय असेल ते माहिती नाही. एकच लक्ष्य ठेवलं पाहिजे की, तुमचा आमचा स्वाभिमान”, असं बच्चू कडू कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.

‘ही आग आम्ही बुजवणार नाहीत’

“अण्णा भाऊ साठेंनी शाहिरीतून हिंदुस्तान उभा करण्याचं काम केलं. महात्मा जोतिबांनी शेतकऱ्यांच्या आसूड पुस्तक लिहून त्यावेळच्या सरकारवर शेतकऱ्याबाबत घणघणात केला. ही ज्वाला गावागावापर्यंत नेण्याचं काम करावं लागेल. दऱ्याखोऱ्यातला एक-एक आदिवासी बाहेर काढून मतदान टाकल्याशिवाय ही आग आम्ही बुजवणार नाहीत. आम्ही आगीत उडी टाकली आहे. आम्ही हिंमतीने समोर आलो आहोत. आम्हाला उद्या कदाचित जेलची पायरी चढावी लागेल, अशी अवस्था आहे. तरीसुद्धा डर नाही, डरानेवाले को हम डराते हैं”, असं बच्चू कडू म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘एक-एक माणसं कव्हर करा’

“आम्ही अचलपूरमध्ये सुद्धा मागे पडू देणार नाहीत. 15 ते 20 हजाराचं लीड घेतल्याशिवाय थांबायचं नाही. सकाळी पाच वाजता उठायचं, रात्री बारा-एक वाजेपर्यंत लढत राहायचं. एक-एक माणसं कव्हर करा. असं नाही की, बडा नेता आहे म्हणून मत मिळतं. सामान्य माणूस उभा राहतो तर नेताला झुकवून टाकतो. सगळ्या नेत्यांच्या सभा होतील. पण माझा कार्यकर्ता मतदारापर्यंत पोहोचला तर लढाई सोपी आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.

‘अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करायचंय’

“लोकसभा फक्त 5 हजार मतांनी पडलो होतो. ते स्वप्न पूर्ण करायचं आहे. मला माहिती आहे दिनेश भाऊ ते स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. आपलं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं आहे. तटस्थची भूमिका घेता आली असती आणि मस्त झोपून मस्त आराम करता आला असता. पण सगळ्यांनी स्वाभिमान विकला तर उभा कोण राहिल. टक्कर कोण देणार? ही लढाई फक्त बच्चू कडूची नाही तर तुमची-आमची सर्वांची आहे. चालाल तर आयुष्यभर चालत राहाल”, असंही बच्चू कडू यावेळी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.