आठ हजार विद्यार्थ्यांच्या सह्यांचे गडकरींना पत्र, या मृत्यूच्या महामार्गातून सुटकेची विनंती

| Updated on: Sep 17, 2022 | 11:04 PM

आजपर्यंत हा रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून आम्ही नेत्यांच्या मागे धावलो. आमच्या भावनांचा अनादरच झाला. आमच्या आशा केवळ आपल्यावरच आहे. आपणच आमचे विघ्नहर्ता होऊ शकता.

आठ हजार विद्यार्थ्यांच्या सह्यांचे गडकरींना पत्र, या मृत्यूच्या महामार्गातून सुटकेची विनंती
Follow us on

यवतमाळ : यवतमाळ ते अमरावती रस्त्याची अवस्था फारच गंभीर व बिकट आहे. उमरी-यवतमाळ-नेर-अमरावती ते धारणी असा हा तीन राज्यांना जोडणारा राज्य महामार्ग आहे. मात्र अलीकडच्या काळात अमरावती ते यवतमाळ या रस्त्याची अवस्था खड्ड्यात रस्ता अशी झाली आहे. राज्य सरकारकडे या रस्त्यासाठी निधी नाही. त्यामुळं हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग करा, असे साकडे अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्राद्वारे केली आहे.

हा रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून सर्वच स्तरातून झालेले प्रयत्न अयशस्वी झाले. त्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून विद्यार्थ्यांनी नितीन गडकरी यांना भावनिक साद घातली. साहेब, आम्ही रस्ता ओलांडतो तेव्हा आम्हाला भीती वाटते हो. रोज आमच्या समोर अपघातात कोणी ना कोणी मरत हो. उद्या कुणाचा नंबर लागणार असे भीतीचे ढग सतत डोक्यात घोंगवतात. आपला परिचित, सगा सोयरा, नातेवाईक की पुढे आपलाच नंबर येईल का, या भीतीतून आम्ही रोज या मार्गावरून ये जा करीत असतो.

आजपर्यंत हा रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून आम्ही नेत्यांच्या मागे धावलो. आमच्या भावनांचा अनादरच झाला. आमच्या आशा केवळ आपल्यावरच आहे. आपणच आमचे विघ्नहर्ता होऊ शकता. रस्ते अपघाताची मालिका आपणच थांबवू शकता. हा रस्ता नव्हे हा तर मृत्यूचा सापळा आहे. यातून आम्हासह प्रवाशांचे जीवनदाते तुम्हीच होऊ शकता, अशी साद रोशनी सांडे या विद्यार्थिनीने घातली.

हे सुद्धा वाचा

मध्यप्रदेश, महाराष्ट्र व आंध्र प्रदेश अशा तीन राज्यांना जोडणारा राज्य महामार्ग क्रमांक 14 हा शेवटची घटका मोजतोय. तब्बल दोन दशकापासून या रस्त्याची केवळ डागडुजी सुरू आहे. हा रस्ता आता प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरलाय. जागोजागी पडलेले जीवघेणे खड्डे . रोज होणारे अपघात. प्रवाशांना मृत्यूच्या दाढेत नेत आहेत. हा रस्ता राज्य महामार्गाकडून राष्ट्रीय महामार्गाकडे अपग्रेडेशनसाठी प्रस्तावित आहे.