Amravati Crime | अमरावतीत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या, पोलीस मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून घेतली उडी

| Updated on: May 12, 2022 | 1:47 PM

बाळकृष्ण राठोड हे खल्लार पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ते आज सकाळी कर्तव्यावर होते. खाली काहीतरी बिनसल्यानं ते नाराज होत इमारतीच्या चौथ्या मजल्यावर गेले. गेल्या काही दिवसांपासून ते तणावात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर उडी घेतली.

Amravati Crime | अमरावतीत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या, पोलीस मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून घेतली उडी
पोलीस मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून घेतली उडी
Image Credit source: t v 9
Follow us on

अमरावती : जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशनमध्ये (Khallar Police Station) ही खळबळजनक घटना घडली. कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी बाळकृष्ण राठोड (Balkrishna Rathod) ( वय 50 ) यांनी आज सकाळी आत्महत्या केली. पोलीस हेडकॉटर इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. मृतक राठोड यांना दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात (Sub-District Hospital) शवविच्छेदनकरिता दाखल करण्यात आलेले आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी दर्यापूर करीत आहेत. काल वलगाव पोलीस स्थानकात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. लगेच आज राठोड यांनी देखील आत्महत्या केल्याने पोलीस खात्याला झालंय तरी काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नेमकं काय घडलं

बाळकृष्ण राठोड हे खल्लार पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ते आज सकाळी कर्तव्यावर होते. खाली काहीतरी बिनसल्यानं ते नाराज होत इमारतीच्या चौथ्या मजल्यावर गेले. गेल्या काही दिवसांपासून ते तणावात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर उडी घेतली. चौथ्या मजल्यावरून उडी घेतल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी दर्यापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. मृत्यूचे नेमकं कारण माहिती नसलं, तर कर्तव्यावर असल्यानं तणावातून आत्महत्या केली असावी, अशी चर्चा होती.

काल पोलीस उपनिरीक्षकानं संपविलं

वलगाव येथं काल पोलीस उपनिरीक्षकानं गळफास घेतला. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून विजय अडोकर यांनी स्वतःला संपविल्याचा आरोप त्यांच्या वडिलांनी केला. विजय यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना वेळेवर सुटी मिळत नव्हती. बदलीसाठी दिलेला अर्ज नामंजूर करण्यात आला होता. शिवाय तुम्हाला निलंबित का करू नये, असा इशारा वरिष्ठांकडून देण्यात आला होता, असंही विजय यांच्या वडिलांनी सांगितलं. सलग दुसऱ्या दिवशी अमरावती जिल्ह्यात आत्महत्या झाल्यानं पोलीस विभाग खरंच तणावात तर नाही ना, याचा तपास करण्याची वेळ आली आहे.

हे सुद्धा वाचा