अन् मरणाच्या दारातून परतलो; जळगावच्या ओबीसी परिषदेत भुजबळांनी सांगितली दुखरी आठवण!

| Updated on: Sep 25, 2021 | 3:46 PM

'मला तुरुंगात टाकलं. प्रकृती खूप गंभीर झालेली. वाटलं सगळं संपलं, पण मी त्या मरणाच्या दारातून परतलो,' अशी भावुक आठवण शनिवारी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितली आणि क्षणभर उपस्थितही हेलावून गेले.

अन् मरणाच्या दारातून परतलो; जळगावच्या ओबीसी परिषदेत भुजबळांनी सांगितली दुखरी आठवण!
छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री
Follow us on

नाशिकः ‘मला तुरुंगात टाकलं. प्रकृती खूप गंभीर झालेली. वाटलं सगळं संपलं, पण मी त्या मरणाच्या दारातून परतलो,’ अशी भावुक आठवण शनिवारी (25 सप्टेंबर) जळगाव येथे झालेल्या ओबीसी परिषदेमध्ये (OBC Reservation) अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितली आणि क्षणभर उपस्थितही हेलावून गेले. (And I came through the door of death, Bhujbal recalled at the OBC conference)

खरं तर आजच्या परिषदेमध्ये भुजबळांनी तुफान टोलेबाजी केली. त्यामुळं हशा, टाळ्या असं चित्र होतं. भुजबळ एखादं वाक्य फेकायचे. क्षणभर पॉज घ्यायचे. अन् पुन्हा सुरू व्हायचे. त्यांच्या बोलण्यातला प्रसंग संपला की, एकच खसखस पिकायची. असा सगळा आनंदी माहोल होता. याच प्रसंगी भुजबळांनी तुरुंगातल्या दुखऱ्या क्षणांच्या आठवणीला हात घातला आणि आमदार कपिल पाटील यांनी आपल्याला कसं वाचवलं, ते सांगितलं. भुजबळ म्हणाले, ‘कपिल पाटलांनी माझा जीव वाचवला. मला जेलमध्ये टाकलेलं. एकदा प्रकृती खूप गंभीर झालेली. तिथं एक गोष्टी सोपी असते. कुणाला तरी जेलमध्ये टाकायचं. आजारी पडला की त्याच्याकडं बघायचंही नाही. एक दिवस हार्ट अटॅकनं गेला म्हणून सांगायचा. विषय तिथंच संपला. माझी प्रकृती बिघडलेली. हे कपिल पाटलांना कळलं. त्यांनी विधिमंडळात आवाज उठवला. ते म्हणाले, तुम्ही काय वागणूक देताय भुजबळांना. हॉस्पिटलमध्ये नेत नाही. नीट काळजी नाही. तिथं मारून टाकणार काय तुम्ही? त्यानंतर शरद पवारांनी पत्र पाठवलं. भुजबळांना काही झालं, तर हे सरकार जबाबदार राहील. अन् सुदैवानं मी बाहेर आलो.’

भाजपवर हल्लाबोल

जो जो या कामात येत नाही त्यांच्या मागे इन्कम टॅक्स लावली जाते, ईडी लावली जाते. जसे एकनाथ खडसे साहेबांच्या मागे लागले. म्हणून सर्वांनी सावध राहा आणि घाबरले असाल त्यांनी भाजपमध्ये जा. म्हणजे सर्व गुन्हे माफ होतील, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला. आज याठिकाणी सर्व जण अतिशय जोरात आणि तावातावात बोलले. उद्या इन्कम टॅक्स घरी आले नाही म्हणजे झालं.खडसेंनाही आज त्रास होतोय.सावध रहा बरं. जे घाबरले असतील त्यांनी भाजपमध्ये जावं. मग सब माफ होईल. भारत सरकारकडून अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात आहेत. धर्मांची अफूची गोळी आज सर्वांवर राज्य करत आहे. मंडल बाहेर आले की लगेच कमंडल बाहेर येतं, असं छगन भुजबळ म्हणाले.

सावित्रीमाईंनी शिकवलं म्हणून अथर्वशीर्ष वाचताय

‘भारत सरकारकडून अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जातंय. फोडा आणि राज्य करा असं भारत सरकार करत आहे. मी कुणाच्या भावनेला हात घालत नाही, दगडूशेठ गणपतीला 50 हजार की 25 हजार आमच्या भगिनी अथर्व, अथर्वशीर्ष सगळ्यांनी म्हटलं.. किती मोठी बातमी. इथून जवळच सावित्रीबाई फुल्यांनी महिलांसाठी शाळा सुरु केली, ती तेवढ्याच अंतरावर आहे, हाकेच्या अंतरावर आहे. पण अथर्वशीर्ष झाल्यानंतर आपण तिथे जाऊन तिथे डोकं टेकवावं असं कुणालाही वाटलं नाही. जे अथर्वशीर्ष तुम्ही वाचलं, ते वाचलं कसं? तर त्यांनी (सावित्रीमाई फुलेंनी) शिकवलं म्हणून,’ असं छगन भुजबळ म्हणाले. (And I came through the door of death, Bhujbal recalled at the OBC conference)

इतर बातम्याः

भाजप विरुद्ध भाजप; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये रंगला सामना

बांधकाम मजुरांना मोफत ‘मध्यान्ह भोजन’; नाशिकमधून सुरुवात, सकस आहार मिळणार