मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाला बसणार मोठा धक्का, आणखी दोन नेते एकनाथ शिंदेंच्या गळाला

मोठी बातमी समोर येत आहे, उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आणखी दोन नेते एकनाथ शिंदे यांच्या संर्पकात असल्याची माहिती समोर आली आहे.

मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाला बसणार मोठा धक्का, आणखी दोन नेते एकनाथ शिंदेंच्या गळाला
uddhav thackeray and eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 09, 2025 | 8:19 PM

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारली होती. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. विधानसभेत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. राज्यात महायुतीचे तीन पक्ष भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट मिळून तब्बल 232 जागा निवडून आल्या तर महाविकास आघाडीला पन्नास जागांवरच समाधान मानावं लागलं. दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आतापर्यंत शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता आणखी दोन धक्के शिवसेना ठाकरे गटला बसण्याची शक्यता आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे दोन माजी आमदार शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.   सुभाष बने आणि गणपत कदम यांनी काल ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौऱ्यामध्ये ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने देखील मशाल सोडून धनुष्यबाण हातात घेणार आहेत. सुभाष बने यांची संगमेश्वर, चिपळूण आणि लांजा तालुक्यातल्या काही भागात ताकद आहे, तर  कदम हे राजापूर – लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का ठरू शकतो.

दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन साळवी हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यावर शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भामध्ये एकनाथ शिंदेंसोबत माझी चर्चा झालेली नाही, आम्ही याच्यावर सविस्तर चर्चा करू त्यानंतर ते पक्षामध्ये येत असताना त्यांच्या काय इच्छा आकांक्षा आहे त्याच्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. माझे मोठे बंधू त्या मतदारसंघातून त्यांचा पराभव करून निवडून आलेले आहेत. त्यांनाही विश्वासात घेणे गरजेचे आहे या सर्व गोष्टीचा विचार  झाल्यावरच शिंदे साहेब विचार करतील, असं सामंत यांनी म्हटलं आहे.