राजस्थानातल्या घोटाळ्याचं औरंगाबाद कनेक्शन काय? पहाटेपासून धाडसत्र, 4 ठिकाणं 56 अधिकारी..

| Updated on: Sep 07, 2022 | 3:44 PM

राजस्थानातील मिड डे मिल योजनेसंबंधी व्यक्ती आणि संस्थांवर आज देशभरात छापेमारी होत आहे. जवळपास 53 ठिकाणी आयकर विभागाने एकाच वेळी धाडसत्र सुरु केलं आहे. औरंगाबादमधील धाडीही त्याच संबंधी असल्याचं समोर आलंय. लवकरच याविषयी स्पष्ट माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.

राजस्थानातल्या घोटाळ्याचं औरंगाबाद कनेक्शन काय? पहाटेपासून धाडसत्र, 4 ठिकाणं 56 अधिकारी..
औरंगाबादेत सतीश व्यास यांच्या घरावर छापेमारी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबादः राजस्थानमधील मिड डे मिल घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आज देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये छापेमारी सुरु आहे. मुंबई, दिल्ली, जयपूर, बंगळुरूसह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी सुरु केली आहे. औरंगाबाद शहरातही पहाटेपासूनच चार ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणांनी छापेमारी सुरु केली आहे. राजस्थानातील शालेय पोषण आहार आणि मध्यान्ह भोजनाच्या अन्नधान्य पुरवठादारावर हे छापे असल्याची माहिती समोर आली आहे. सतीश व्यास असं या अन्नधान्य पुरवठादाराचं नाव आहे.

औरंगाबाद धाडीतील अपडेट्स काय?

औरंगाबादेत केंद्रीय तपास यंत्रणांनी पहाटेपासून चार ठिकाणी धाड टाकली आहे. राजस्थानातील मिड डे मिल घोटाळ्याचे इथे कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे. शहरातील अन्नधान्य पुरवठादार सतीश व्यास यांच्याशी संबंधित ही कारवाई सुरु आहे.

सतीश व्यास यांचे घर कार्यालय आणि हॉटेलवर आज छापे पडले. त्याशी संबंधित चार ठिकाणी अधिकाऱ्यांकडून झाडा झडती घेतली जात आहे.

हे व्यापारी शिवसेनेशी संबंधित असल्याचं बोललं जातंय.

एका ठिकाणी किमान 14 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून तपासणी सुरू आहे. अशा प्रकारे चारही ठिकाणे मिळून 56 अधिकाऱ्यांचा छाप्यांमध्ये समावेश आहे.

राजस्थानातील अन्नधान्य घोटाळा प्रकरणी छापे मारल्याचा अंदाज सध्या वर्तवला जातोय. सतीश व्यास यांच्याकडे राजस्थानातील अन्नधान्य पुरवठ्याचा ठेका असल्याचा सूत्रांचा अंदाज आहे.

राजस्थानमधील घोटाळ्यासंदर्भात औरंगाबादेत सतीश व्यास यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती महत्वाची कागदपत्रे पडल्याची माहिती समोर आली आहे.

देशात 53 ठिकाणी धाडी

राजस्थानातील मिड डे मिल योजनेसंबंधी व्यक्ती आणि संस्थांवर आज देशभरात छापेमारी होत आहे. जवळपास 53 ठिकाणी आयकर विभागाने एकाच वेळी धाडसत्र सुरु केलं आहे. राजस्थानचे राज्यमंत्री राजेंद्र यादव यांच्या मालमत्तांवरही आयकर विभागाने छापा मारल्याचं सांगण्यात येतंय. तर कोट पुतळी येथील राजेंद्र यादव यांच्या कारखान्यालाही टार्गेट करण्यात आलंय.