एक उंदीर… शहरात चर्चा, हायकोर्ट म्हणतं, हे तर टॉम अँड जेरीच्या खेळासारखं… काय आहे प्रकरण?

| Updated on: Sep 22, 2022 | 12:10 PM

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या पाणी प्रश्नाला राजकीय पक्षांकडून चांगलीच हवा दिली जाणार आहे. पण त्या आधी एका उंदराच्या कारनाम्यांमुळे इथल्या जीर्ण पाणीपुरवठा योजनेकडे सर्वांचं लक्ष वेधलंय.

एक उंदीर... शहरात चर्चा, हायकोर्ट म्हणतं, हे तर टॉम अँड जेरीच्या खेळासारखं... काय आहे प्रकरण?
Image Credit source: social media
Follow us on

औरंगाबादः एका उंदराच्या (Rat) कारनाम्याची चर्चा गेल्या तीन दिवसांपासून शहरात आहे. उंदरामुळे तब्बल 13 तास पाणीपुरवठा (water supply) खंडित झाला. कोर्टात आधीपासूनच शहरातल्या पाणी पुरवठ्याचा वाद आहे. त्यामुळे  हायकोर्टालाही या प्रकारावर गंभीर टिप्पणी करावी लागली. उंदरामुळे वारंवार पाणी गळती होणं हा तर टॉम अँड जेरीच्या खेळासारखा प्रकार झाला, असं कोर्टानं म्हटलंय. हे घडलंय औरंगाबाद (Aurangabad) शहरात. दोन दिवसांपूर्वी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी येथील पंपगृहात दोन दिवसांपूर्वी उंदरामुळे शॉर्ट सर्किट झालं. तब्बल 11 तास पाण्याचा उपसा बंद झाला.

सोमवारी पहाटेच पंपगृहातल्या मेनहोलमध्ये उंदीर शिरला. स्पार्किंग होऊन वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नव्या आणि जुन्या अशा दोन्ही योजनांचा पाणी उपसा सुरु होण्यासाठी 13 तास लागले. त्यामुळे पुढील काही दिवस पाणी पुरवठा विस्कळीत झाला.

त्यामुळे शहराला किमान तीन दिवसांनी पाणीपुरवठा झालाच पाहिजे, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी दिले. हे करणं का अशक्य आहे, याची कारणं मनपाकडून मांडण्यात आली. त्यांचाही न्यायमूर्तींनी कडक शब्दात समाचार घेतला.

कोर्टानं म्हटलं….

  • आपण अल्ट्रा मॉडर्न (आधुनिक) युगात वावरतो. अॅपल आणि गुगलच्या मदतीने आज सगळं शक्य असतानाही पाणी पुरवठ्यातल्या अडचणी दूर का होत नाहीत?
  •  मनपाची मानसिकताच पाचव्या दिवशी पाणीपुरवठा करायची आहे… असे बोल न्या. रवींद्र घुगे  आणि न्या. अरुण पेडणेकर यांनी सुनावले.
  •  जलवाहिनीत उंदीर घुसल्याने एक दिवस पाणीपुरवठा बंद करावा लागतो? हे तर टॉम अँड जेरीच्या खेळासारखं आहे.
  •  हा उंदीर दोन पायांचा होता की चार पायांचा हे एकदा तपासावं लागेल…
  •  यावर सरकारी वकील अॅड. ज्ञानेश्वर काळे म्हणाले, उंदीर जलवाहिनीत नाही तर वीजेच्या सॉकेटमध्ये घुसला होता. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला.
  •  त्यावर मानवी चुकीमुळेच हा प्रकार घडला का, हा शोध घ्या, असे आदेशही हायकोर्टानं दिलेत.

निवडणुकीत औरंगाबादचं पाणी पेटणार?

आगामी महापालिका निवडणुकीत औरंगाबाद शहराचा पाणी प्रश्न चांगलाच पेटण्याची चिन्ह आहेत. शहरातील जुन्या पाणीपुरवठा योजनेची दैन्यावस्था झाली असून नवी पाणीपुरवठा योजना अत्यंत संथगतीने सुरु आहे. त्यामुळे शहराला कुठे पाच तर कुठे सहा, सात दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. त्यातच जीर्ण झालेल्या जलवाहिनीत बिघाड झाल्यास पाणीपुरवठ्याचं वेळापत्रकही पूर्ण कोलमडतं. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर भाजपने या मुद्द्यावरून चांगलाच निशाणा साधला आहे. काही महिन्यांपूर्वी स्वतः देवेंद्र फडणवीसांनी येथे जलाक्रोश मोर्चा काढला होता. त्याला शिवसेनेही प्रत्युत्तर देत, तुम्हीही सत्तेत असताना काय केलं, असा सवाल विचारला आहे.