मोठी बातमी ! संभाजीनगरातील राड्यात एकाचा मृत्यू, 14 पोलीस जखमी; जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता

| Updated on: Mar 31, 2023 | 11:59 AM

संभाजीनगर जिल्ह्यात परवा झालेल्या राड्यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर 14 पोलीस जखमी झाले आहेत. या राड्याप्रकरणी 300 ते 400 अज्ञातांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत सातजणांना अटक करण्यात आली आहे.

मोठी बातमी ! संभाजीनगरातील राड्यात एकाचा मृत्यू, 14 पोलीस जखमी; जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता
chhatrapati sambhaji nagar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

संभाजीनगर : संभाजीनगर जिल्ह्यातून मोठी बातमी आहे. काल संभाजीनगरमध्ये झालेल्या दोन गटातील राड्यात एकजण जखमी झाला होता. या व्यक्तीचा आज मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती 51 वर्षाची होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या राड्यात 14 पोलीसही जखमी झाले आहेत. काही पोलिसांना किरकोळ तर काहींना गंभीर मार लागला असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहे. दरम्यान, किराडपुरा येथे तणावपूर्ण शांतता आहे. किराडपुरातील काही दुकाने उघडली आहेत. वाहतूकही काही प्रमाणात सुरू झाली आहे. या भागात सकाळपासून कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.

औरंगाबादच्या किराडपुरा भागात परवा रात्री साडेबारा वाजता दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. यावेळी दोन्ही गटाकडून प्रचंड दगडफेक करण्यात आली होती. तसेच अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. यात पोलिसांच्या 12 गाड्या जाळण्यात आल्या होत्या. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला होता. रमजानचे दिवस सुरू आहेत. शिवाय काल रामनवमी असतानाच हा राडा झाल्याने पोलिसांनी या भागात मोठा बंदोबस्त ठेवला होता.

हे सुद्धा वाचा

गुन्हा दाखल

पोलिसांनी या हल्ल्यानंतर तात्काळ सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींची ओळख पटवण्यास सुरुवात केली. आतापर्यंत 20 जणांची ओळख पटली आहे. त्यापैकी सात जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांवर दंगल करणे, प्राणघातक हत्यारे बाळगणे, जीवानिशी मारणे, सराकरी अधिकाऱ्यांवर हल्ला करणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांना कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक भंडारी यांनी दिली. या राड्याप्रकरणी 300 ते 400 अज्ञातांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस बंदोबस्त कायम

दरम्यान, परवापासून किराडपूरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त होता. कालपासून या भागात सीआरपीएफची पथकं, दंगल नियंत्रण पथक आणि स्थानिक पोलीस तैनात आहे. काल किराडपुरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आज सकाळी या भागातील काही दुकाने उघडली. तर काही व्यापाऱ्यांनी आजही दुकाने बंद ठेवणे पसंत ठेवलं. तसेच या भागात तुरळक प्रमाणात वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, लोकांना एकत्र जमून गप्पा मारण्यास, घोळक्याने जमण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संशयितांवर आणि संशयित वाहनांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत.