औरंगाबादमधील नव्या जलवाहिनीच्या कामाला गती द्या, अन्यथा दंडात्मक कारवाई, कंत्राटदाराला इशारा

| Updated on: Oct 21, 2021 | 3:16 PM

1680 कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे काम सुरु आहे. हैदराबाद येथील जेव्हीपीआर कंपनीला काम देण्यात आले आहे.

औरंगाबादमधील नव्या जलवाहिनीच्या कामाला गती द्या, अन्यथा दंडात्मक कारवाई, कंत्राटदाराला इशारा
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us on

औरंगाबादः शहरात सुरु असलेल्या नव्या जलवाहिनीचे (New pipeline, Aurangabad) काम पावसामुळे रखडले होते. मात्र आता पावसाळा संपला असून कामांना गती द्या, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (मजिप्रा) अधिकाऱ्यांनी हैदराबाद येथील जेव्हीपीआर (JVPR) कंपनीला दिला आहे. राज्य सरकारने 1680 कोटी रुपयांचा निधी दिल्यानंतर शहरात नव्या जलनाहिनीच्या कामांना सुरुवात झाली होती. मात्र सततच्या पावसामुळे हे काम अनेक दिवसांपासून संथ गतीने सुरु आहे. आता नोव्हेंबरमध्ये औरंगाबादमधील मुख्य जलवाहिनीच्या कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

1680 कोटी रुपयांची योजना

महाविकास आघाडी सरकारने शहरासाठी 1680 कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे या योजनेवर काम सुरु आहे. हैदराबाद येथील जेव्हीपीआर कंपनीला काम देण्यात आले आहे. त्यानुसार कंपनीने सहा महिन्यांपूर्वीच शहरात कामाला सुरुवात केली आहे. शहरात 15 जलकुंभ उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून आणखी 5 जलकुंभांचे काम सुरु करण्यात आले आहेत.

शहरातच पाइपची फॅक्ट्री

या जलवाहिनीच्या योजनेत जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत 8 फूट व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. या पाइपची लांबी आणि रुंदी बरीच असल्याने तो इतर ठिकाणहून वाहून आणण्यास प्रचंड त्रास झाला असता. म्हणून पाइप औरंगाबादेत तयार केले जाणार आहेत. नोव्हेंबरपर्यंत मुख्य जलवाहिनीचे पाइप तयार होतील, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी कंत्राटदाराने नक्षत्रवाडीजवळ पाइप तयार करण्याची फॅक्ट्री उभारण्याचे काम सुरु केले आहे. या ठिकाणी पत्र्याचे शेड उभारले जात असून दोन मशीन आणण्यात आल्या आहेत.

योजनेची आणखी काय वैशिष्ट्ये?

– या योजनेतून शहराला 604 एमएलडी पाणी मिळेल.
– योजनेअंतर्गत शहराला 2052 सालापर्यंत लाभ मिळेल.
– पाणीपुरवठ्यासाठी शहराला दरमहा 08 कोटी रुपयांचा खर्च येईल.
– योजनेत जायकवाडी धरणावर उद्भव विहीर व पंपगृह उभारले जातील.
– 392 एमएलडी एवढ्या क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र
– शहर व सातारा देवळाई क्षेत्रात विविध ठिकाणी 49 उंच तर 4 जमिनीलगत अशा पाण्याच्या 53 टाक्या उभारल्या जातील.
– अशुद्ध पाण्यासाठी जवळपास 40 किमी लांबीची पाण्याची जलवाहिनी टाकली जाईल.
– 84 किलोमीटरची पाणी वाहून नेणारी जलवाहिनी यात टाकली जाईल. तसेच 1,911 किमी लांबीची वितरण व्यवस्था असेल.
– सुमारे 90 हजार घरगुती नळजोडण्या योजनेअंतर्गत दिल्या जातील.

इतर बातम्या-

औरंगाबाद खंडपीठाच्या अतिरिक्त बिल्डिंगचा उद्घाटनापूर्वीच वाद, वकील संघाची नाराजी, बहिष्काराचे संकेत

पुरुषांना बांधून ठेवले अन् चौघांची वासना जागृत झाली, तोंडोळी दरोड्याची आपबिती, औरंगाबाद पोलिसांसमोर नवे आव्हान!