मोठी बातमी ! शेतकऱ्यांना नुकसानभरपाई कधी मिळणार? कृषी मंत्र्यांने केलं मोठं विधान

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार शेतकऱ्यांना तातडीने भरीव आर्थिक मदत देईल. पंचनाम्याची प्रक्रिया सुरू राहील, पण प्राथमिक अहवालावर आधारित त्वरित भरपाई दिली जाईल. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.

मोठी बातमी ! शेतकऱ्यांना नुकसानभरपाई कधी मिळणार? कृषी मंत्र्यांने केलं मोठं विधान
dattatray bharane
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 19, 2026 | 11:44 AM

राज्यातील अर्ध्याहून अधिक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची आणि शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई देण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र, राज्य सरकारने 5 ऑक्टोबरपासून पंचनामे करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतरच शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यांमध्ये सोयाबीन आणि इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीची संपूर्ण माहिती तसेच आढावा बैठकीत घेतला जात आहे. केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरीव मदत दिली जाईल. अनेक भागांत सोयाबीन करपले असून शेंगांमध्ये दाणेच भरलेले नाहीत, त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे, या सर्वांना लवकरच भरपाई दिली जाणार असल्याची घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे.

वाऱ्यावर सोडणार नाही

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दुष्काळावरून केलेल्या टीकेवरही भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांच्या संकटावर कोणीही राजकारण करू नये. विरोधक असो वा सत्ताधारी, सर्वांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकत्र येणे गरजेचे आहे. अडचणीच्या काळात राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असं भरणे यांनी स्पष्ट केलं.

तातडीने मदत करणार

ज्या ठिकाणी पीकच शिल्लक राहिलेले नाही, तिथे मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग करून शेतकऱ्यांना पीक विम्याचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. पंचनाम्यांची औपचारिक प्रक्रिया सुरू राहीलच, मात्र प्राथमिक अहवालानुसार शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यावर भर राहील, अशी माहितीही त्यांनी दिली.

नांदेडमध्ये बैठक सुरू

दरम्यान, नांदेडमध्ये दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक सुरू आहे. या बैठकीला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत राज्य ऊर्जामंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, पालकमंत्री अतुल सावे, खासदार अशोक चव्हाण, नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण, परभणीचे खासदार संजय जाधव, खासदार रामराव वडकुते, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार कल्याण काळे, खासदार अजित गोपछडे, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, हेमंत पाटील, चंद्रकांत नवघरे, बाबुराव पाटील कोहळीकर, सैईद खान, कैलास पाटील, अमर राजूरकर, तुषार राठोड, आनंदाराव पाटील बोंढारकर यांच्यासह अनेक आजी माजी आमदार या बैठकीला उपस्थित आहे. काही आमदारांनी बैठकीला ऑनलाईन हजेरी लावली आहे.

तातडीने मदत करा

दरम्यान, या बैठकीला भाजपचे खासदार अशोक चव्हाण ऑनलाईन उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी पीक कापणी प्रयोगाची आट न घालता शेतकऱ्यांना मदत केली पाहिजेत, अशी मागणी केली. पीक कंपन्या ट्रिगरच्या नावाखाली वेळ काढूपणा करतात. त्यामुळे त्याची वाट पाहू नये. मराठवाड्यातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळाली पाहिजे, असं अशोक चव्हाण म्हणाले.

तर नांदेड जिल्ह्यातील 11 नव्हे तर 16 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात यावा. शेतकऱ्यांना वीज द्या. पंचनाम्याची वाट न पाहता शेतकऱ्यांना सरसकट मदत करा, अशी मागणी काँग्रेसचे नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us