Aurangabad | मनसेनंतर शिवसेना सभा घेणार असेल तर MIM मागे नाही, आम्हाला कोण थांबवतो पाहू.. खा. इम्तियाज जलील यांचं आव्हान!

| Updated on: May 05, 2022 | 10:23 AM

रस्ते आणि पाण्याच्या दोन प्रमुख समस्यांनी हैराण असलेल्या औरंगाबादकरांचा विश्वास संपादन करण्याच्या दृष्टीने औरंगाबादची शिवसेनेची सभा महत्त्वाची ठरू शकते. तसेच शिवसेना आणि मनसेला आव्हान देत एमआयएमदेखील कशा प्रकारे सभा घेते, याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

Aurangabad | मनसेनंतर शिवसेना सभा घेणार असेल तर MIM मागे नाही, आम्हाला कोण थांबवतो पाहू.. खा. इम्तियाज जलील यांचं आव्हान!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबादः मनसेच्या (MNS) भव्य सभेनंतर शिवसेनेची तोफही औरंगाबदामध्ये धडाडणार आहे. त्यामुळे एमआयएमदेखील (MIM) गप्प बसणार नाही. त्याच मैदानावर खुर्च्या न टाकता एमआयएम प्रचंड भल्य सभा घेणार. तेव्हा मला कोण थांबवतो ते पाहू, असं आव्हान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी दिलं आहे. मनसेनं औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा चांगल्याच गाजल्या होत्या. त्यामुळे राज ठाकरे यांनीदेखील महाराष्ट्र दिनानिमित्त त्याच मैदानावर भव्य सभा आयोजित केली. आता शिवसेनादेखील येत्या 8 जून रोजी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त औरंगाबादमध्ये त्याच ग्राऊंडवर सभा घेण्याच्या पवित्र्यात आहे. त्यामुळे मनसेनंतर शिवसेना सभा घेणार असेल तर एमआयएमदेखील मागे राहणार नाही. आम्हीदेखील त्याच ग्राऊंडवर सभा घेणार असल्याचं खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं. महापालिका निवडणुकांची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिल्यानंतर विविध राजकीय पक्षांना निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने आगामी शिवसेना आणि एमआयएमची सभा महत्त्वाची ठरू शकते.

08 जून रोजी उद्धव ठाकरेंची सभा

शिवसेना प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. शिवसेनेची मराठवाड्यातील पहिली शाखा 08 जून 1985 रोजी स्थापन झाली होती. या शाखेच्या 37 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्याचे ठरवण्यात आले आहे. येत्या 14 मे रोजी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा मुंबईत बीकेसीवर होणार आहे. त्यानंतर औरंगाबादमध्ये सभा होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

शिवसेना आणि एमआयएमची सभा महत्त्वाची

ओबीसी आरक्षणाशिवायच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, असे आदेश नुकतेच सुप्रीम कोर्टानं दिल्यानंतर राज्यात येत्या काही दिवसात नगरपालिका तसेच महानगर पालिकांच्या निवडणुकांना वेग येण्याची चिन्हं आहेत. त्यातच मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसावरून मनसे आणि भाजपाने हिंदुत्वासाठी आग्रही भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप आणि मनसे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकत्र येत, निवडणुकीतही एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये अडकलेल्या शिवसेनेला औरंगाबादचा गड राखण्याचे मोठे आव्हान आहे. त्यातच एमआयएमची ताकदही वाढलेली आहे. औरंगाबाद महापालिकेत मनसेचे संख्याबळ शून्यच असले तरीही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेची मतं खाण्यासाठी मनसे महत्त्वाची भूमिका बजावू शकते. रस्ते आणि पाण्याच्या दोन प्रमुख समस्यांनी हैराण असलेल्या औरंगाबादकरांचा विश्वास संपादन करण्याच्या दृष्टीने औरंगाबादची शिवसेनेची सभा महत्त्वाची ठरू शकते. तसेच शिवसेना आणि मनसेला आव्हान देत एमआयएमदेखील कशा प्रकारे सभा घेते, याकडेही सर्वांचे लक्ष आहे.