Aurangabad | विमानतळ विस्तारीकरणात 35 एकर जागा कमी होणार, अनेकांची घरं वाचणार, काय झाला निर्णय?

| Updated on: May 13, 2022 | 6:00 AM

जुन्या आराखड्यात काही बदल करण्यात आले असून आता या प्रक्रियेत 35 एकर जागा कमी झाल्याने अनेकांची घरं वाचली आहेत. जागा कमी झाल्याने आता धावपट्टीचे वळण (क्रॉस) विस्तारीकरण केले जाणार आहे. त्यामुळे अनेक घरे विस्तारीकरणाच्या प्रक्रियेतून वाचतील.

Aurangabad | विमानतळ विस्तारीकरणात 35 एकर जागा कमी होणार, अनेकांची घरं वाचणार, काय झाला निर्णय?
Follow us on

औरंगाबादः चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Aurangabad Airport) विस्तारीकरणाची (Expansion) चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. विस्तारीकरण प्रक्रियेत मोठे भूसंपादन करावे लागणार असल्याने परिसरातील नागरिकांना (Aurangabad citizens) आपली घरं वाचणार की जाणार, अशी चिंता होती. मात्र जुन्या आराखड्यात काही बदल करण्यात आले असून आता या प्रक्रियेत 35 एकर जागा कमी झाल्याने अनेकांची घरं वाचली आहेत. जागा कमी झाल्याने आता धावपट्टीचे वळण पद्धतीने विस्तारीकरण केले जाणार आ . यासंदर्भातला नकाशाही तयार करण्यात आल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाने दिली. त्यामुळे औरंगाबाद शहरातील विमानतळ परिसराती अनेक नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

नेमका बदल काय झाला?

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी 182 एकर जागेच्या भूसंपादनाची प्रतीक्षा केली जात होती. जागेची मोजणीही झाली होती. परंतु 182 एकर ऐवजी आता 147 एकर जागेचे भूसंपादन होणार आहे. नागरिकांची घरं वाचवण्यासाठी असा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात मुंबईत नुकतीच एक बैठक पार पडली. सध्याची धावपट्टी ही चिकलठाणा ते मुकुंदवाडीच्या दिशेने आहे. विस्तारीकरणात चिकलठाण्याच्या दिशेने धावपट्टी वाढणार होती. मात्र सध्या धावपट्टी एक डिग्री वळवून विस्तारीकरण केले जाणार आहे. यासाठी केवळ परिसरातील शेत जमिनीचे भूसंपादन करावे लागेल. अशाप्रकारे विस्तारीकरण केल्यास रेल्वे रुळाची कोणतीही अडचण येत नसल्याचे विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

विस्तारीकरणाचा फायदा काय?

औरंगाबादमधील पर्यटकांची वाढती संख्या, औद्योगिक विकास तसेच शहराची वेगाने होत असलेली वाढ यामुळे विमानतळाचे विस्तारीकरण आवश्यक आहे. विमानतळाची धावपट्टी सध्या 9 हजार 300 फूट लांबीची आहे. सध्या छोट्या आणि मध्यम आकाराची विमाने उड्डाण करीत आहेत. जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या जम्बो विमानांचे उड्डाण करण्यासाठी 12 हजार फुटांची धावपट्टी होणार आहे. चिकलठाणा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी 182 एकरची जागा द्यावी, असा प्रस्ताव देण्यात आला होता. धावपट्टीचा विकास झाल्यानंतर एअरबससारखी मोठी विमाने विमानतळावर उतरू शकतील. प्रवाशांचीही संख्या वाढेल. विस्तारीकरणात धावपट्टी क्रॉस केली जाणार असल्याचे विमानतळाचे संचालक डी.जी. साळवे यांनी सांगितले.

आणखी काय सुविधा मिळणार?

औरंगाबाद विमानतळाच्या 147 एकर विस्तारीकरणासाठी लागणारा 450 ते 500 कोटींचा खर्च केंद्र तातडीने देईल. येथे विमानतळ जुने असल्याने उडाण योजनेत त्याचा समावेश करता येणार नसला तरीही 18 नव्या शहरांना जोडणाऱ्या हवाईसेवेचा या योजनेत समावेश करता येईल. दिल्ली, मुंबई आणि पुण्यासाठी सकाळीही विमानसेवा सुरु करता येईल, अशी ग्वाही केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी औरंगाबादच्या शिष्टमंडळाला दिली. दिल्लीत केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांची औरंगाबादच्या शिष्टमंडळासह भेट घेतली, त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं.