राज्यपालांच्या वक्तव्याचे औरंगाबादेत तीव्र पडसाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात निषेध ठराव मंजूर

| Updated on: Mar 07, 2022 | 5:41 PM

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तर राज्यपालांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी बराच गोंधळ माजला. तसेच विविध पक्षांनी रस्त्यावर उतरून राज्यपालांनी राजीनामा द्यावा, ही मागणी लावून धरली आहे. त्यानंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातदेखील राज्यपालांविरोधात निषेधात्मक ठराव मंजूर करण्यात आला.

राज्यपालांच्या वक्तव्याचे औरंगाबादेत तीव्र पडसाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात निषेध ठराव मंजूर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
Follow us on

औरंगाबादः शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच राज्यपाल हे विद्यापीठाचे कुलपती असल्याने त्यांच्या निषेधाचा ठराव आज विद्यापीठात मांडण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमान करणारे वक्तव्य केल्याने तसेच न्यायालयाने दिलेल्या आदेशाची पायमल्ली करणारे वक्तव्य केल्याचा आरोप करत विद्यापाठात त्यांच्या निषेधाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. एखाद्या विद्यापीठात कुलपतींविरोधात अशा प्रकारचा ठराव होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असल्याने याची चर्चा राज्यभरात होत आहे.

कोणत्या वक्तव्याचा निषेध?

औरंगाबादमध्ये 27 फेब्रुवारी रोजी श्री समर्थ साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना ते म्हणाले (त्याचा मराठीतून अर्थ असा-), ‘चाण्याक्यांशिवाया चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? शिवाजीला किंवा चंद्रगुप्ताला छोटं नाही म्हणत मी. पण गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं. छत्रपतींनी समर्थांना म्हटलं की, राज्य मला तुमच्या कृपेने मिळालयं. आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले, या राज्याची चावी मी तुम्हाला देतो. त्यावर समर्थ म्हणाले, ही राज्याची चावी मला कुठे देता, तुम्हीच याचे ट्रस्टी आहात”, असं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केलं. समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत की नाही, यावरून पूर्वी खूप मोठा वाद झाल्यानंतर तो कोर्टात गेला होता. राज्यपालांनी हे वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्यांचा निषेध केला जात आहे.

विविध राजकीय पक्षांचे आंदोलन

राज्यपालांनी याआधी पुणे येथील कार्यक्रमातदेखील सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या लग्नावरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळेही विविध पक्षांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तर राज्यपालांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी बराच गोंधळ माजला. तसेच विविध पक्षांनी रस्त्यावर उतरून राज्यपालांनी राजीनामा द्यावा, ही मागणी लावून धरली आहे. त्यानंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातदेखील राज्यपालांविरोधात निषेधात्मक ठराव मंजूर करण्यात आला.

इतर बातम्या-

Namita Mundada | ‘Beed जिल्ह्यात खुलेआम दारूविक्री, पोलिसांचा धाक राहिला नाही’

MNS : नवाब मलिक यांना भेटण्यासाठी आर्थर रोड जेलला जायचं का? संदीप देशपांडेंचा खोचक सवाल