Aurangabad| पुतळ्यावर एक कोटी खर्च करण्याऐवजी सैनिकी शाळा सुरु करावी, खासदार इम्तियाज जलील यांची मागणी!

| Updated on: Jan 22, 2022 | 3:33 PM

खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रात नमूद केले की, महान शुरवीर महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारुन काहीही साध्य होणार नाही. महाराणा प्रताप यांच्या प्रती खरा आदर व सन्मान सैनिकी शाळाच असेल.

Aurangabad| पुतळ्यावर एक कोटी खर्च करण्याऐवजी सैनिकी शाळा सुरु करावी, खासदार इम्तियाज जलील यांची मागणी!
Follow us on

औरंगाबाद : शहरातील कॅनॉट परिसरात एक कोटी रुपयांचा निधी खर्च करून महाराणा प्रताप पुतळा उभारला जाणार आहे. मात्र एवढे पैसे खर्च करून पुतळा उभारण्याऐवजी महाराणा प्रताप यांच्या नावाने ग्रामीण भागातील युवक, युवतींसाठी सैनिकी शाळा सुरु करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केली आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) तसेच जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण आणि मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्याकडे लेखी पत्राद्वारे खासदार जलील यांनी ही मागणी केली आहे.

पुतळा उभारणीस खासदारांचा विरोध

मागील महिन्यात पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार अतुल सावे आणि अंबादास दानवे यांनी सिडको कॅनॉट परिसरात महाराणा प्रताप पुतळा उभारण्याच्या कामास सुरुवात करण्याची मागणी केली होती. या बैठकीतच खासदार इम्तियाज जलील यांनी पुतळा उभारणीला विरोध केला होता. याच निधीतून ग्रामीण भागातील युवक व युवतींना राष्ट्रीय सेवेसाठी सैनिकी शाळा सुरु करण्याची मागणी केली होती. त्यासंबंधीचे पत्र आज त्यांनी सादर केले.

सैनिकी शाळा हाच महाराणांप्रती आदर- खासदार

खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले की, महाराणा प्रताप उदयपूर, मेवाड येथील शिशोदिया घराण्याचे महान राजा होते. त्यांच्या शौर्यामुळे आणि दृढनिश्चयामुळे त्यांचे नाव इतिहासाच्या पानावर अजरामर झाले. ते लहानपणापासूनच शूर, निर्भय, स्वाभिमानी आणि स्वातंत्र्यप्रेमी होते. अनेक युध्दात त्यांनी पराक्रम गाजवून शत्रूंवर विजय प्राप्त केलेला आहे. अशा थोर, महान शुरवीर महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारुन काहीही साध्य होणार नाही. महाराणा प्रताप यांच्या प्रती खरा आदर व सन्मान सैनिकी शाळाच असेल; कारण त्यांच्यापासून प्रेरणा घेवून ग्रामीण भागातील युवक व युवती सैनिक शाळामधून देश संरक्षणासाठी प्रशिक्षण घेतील. सदर सैनिकी शाळांमधून सक्षम आणि प्रशिक्षित लष्करी अधिकारी घडविण्याचे काम केले जाईल. सैनिक शाळेमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना लष्कर, हवाई दल आणि नौदलात नोकरी उपलब्ध होईलच तसेच विविध इतर शासकीय आणि खाजगी क्षेत्रातसुध्दा रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री सुभाष देसाई, जिल्हाधिकारी व मनपा प्रशासक यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

इतर बातम्या-

Navneet Rana यांची ऑडिओ क्लिप व्हायरल, वक्तव्यावर पीडित महिलेचा आक्षेप

Wardha Abortion | आर्वी गर्भपात प्रकरणात आरोग्य विभागाकडून कागदी घोडे नाचवण्याचे प्रकार, शल्य चिकित्सकांकडून असहकार्य