Aurangabad | त्यांना वाटतं मुस्लिमांना शिव्या देऊन ते मोठे होतील…पण 70 वर्षानंतर देशात ऐक्य ही सकारात्मक बाब; खासदार इम्तियाज जलील यांचं वक्तव्य

| Updated on: May 02, 2022 | 4:26 PM

राज ठाकरे यांच्या सभांमागे भाजपाचा हात आहे, अशी चर्चा सुरुवातीला होती. मात्र स्वतःला मोठं करण्यासाठी इतर पक्षांची ही चाल आहे, असा राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव न घेता, सूचक इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला.

Aurangabad | त्यांना वाटतं मुस्लिमांना शिव्या देऊन ते मोठे होतील...पण 70 वर्षानंतर देशात ऐक्य ही सकारात्मक बाब; खासदार इम्तियाज जलील यांचं वक्तव्य
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबादः शिवसेना, मनसे (MNS) आणि भाजप या तिन्ही पक्षांना वाटतं की मुस्लिमांना (Muslims) शिव्या दिल्यानंतर ते मोठे होतील. ते अनेक वर्षांपासून हेच करत आले आहेत. पण या सगळ्यात सकारात्मक बाब म्हणजे 70 वर्षानंतरही देशात हिंदू-मुस्लिम ऐक्याने राहत आहेत. देशातल्या 98 टक्के लोकांना शांतता हवी आहे. कालच्या सभेत उरलेले दोन टक्के होते. त्यामुळे या भाषणाचा तरुणांवर फार परिणाम होणार नाही, असं वक्तव्य खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी दिलं. राज ठाकरे यांच्या भाषणाचे औरंगाबादमध्ये काय पडसाद उमटतात, विशेषतः एमआयएम यावर काय प्रतिक्रिया देते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र एमयआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुस्लिम समाजाला यावर अत्यंत संयमित प्रतिक्रिया देण्याचं आवाहन केलं. तसंच कोणत्याही प्रकारचा विरोध करू नका, असं सांगितलं. राज ठाकरे यांच्या सभेच्या दुसऱ्या दिवशी बोलताना खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरेंच्या भाषणातील मुद्द्यांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली.

‘शिवाजी महाराजांवरचं पुस्तक राज ठाकरेंना देणार’

राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना खासदार इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्र दिनीच महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करणं हे खूप दुर्दैवी असल्याचं म्हटलं. ते म्हणाले, ‘ महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, ज्योतिबा फुले यांच्यामुळे महाराष्ट्राची ओळख आहे. असा महाराष्ट्र ज्यांनी स्थापन केला. त्याच दिवशी अशी भाषा बोलणं. मला माहिती नाही, त्यांना कोणती भाषा कळते. मी त्यांना एक पुस्तक पाठवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, याची माहिती त्यात आहे. सभा सुरु होण्यापूर्वी आपण त्यांच्या पुतळ्याला हार घालतो, भाषणाची सुरुवात त्यांच्यापासून करतो.. त्यांचे पाच टक्के गुण आपल्यात आणले असते तर बरे झाले असते. आजची तरुणपिढी या गोष्टीला प्रतिक्रिया देत नाही.”

तरुणांच्या प्रगतीसाठीचं भाषणात काय होतं?

राज ठाकरे यांच्या भाषणात तरुणांच्या विकासासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठीचे मुद्देच नव्हते. हे सांगताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले, ‘ तरुणांना दररोजच्या जगण्याची चिंता आहे. शंभर रुपयात पेट्रोल किती मिळणार? नोकरी टिकणार का? मुलांची शाळा.. पगार.. ईएमआय हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. तुम्हाला जे भाषण करायचंय ते करा. पण दहा मिनिटं यासाठी देऊ नयेत? महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काय करता येईल, हे बोलायला हवं होतं.

राज ठाकरेंमागे राष्ट्रवादी काँग्रेस?

राज ठाकरे यांच्या सभांमागे भाजपाचा हात आहे, अशी चर्चा सुरुवातीला होती. मात्र स्वतःला मोठं करण्यासाठी इतर पक्षांची ही चाल आहे, असा राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव न घेता, सूचक इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला. महाराष्ट्रातील जनता सुजाण आहे आणि येत्या काळातील घटना पाहता, या राजकारणामागे नेमकं कोण आहे, सगळं त्यांच्या लक्षात येईल, असंही खासदार जलील म्हणाले.