Aurangabad | औरंगाबाद पालिकेच्या प्रभाग रचनेला विलंब, नकाशाच मिळाला नसल्याने खोळंबा; इच्छुकांची धाकधूक वाढली

| Updated on: May 16, 2022 | 12:08 PM

महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ 20 एप्रिल 2020 रोजी समाप्त झाला. तेव्हापासून महापालिकेवर प्रशासक राज आहे.

Aurangabad | औरंगाबाद पालिकेच्या प्रभाग रचनेला विलंब, नकाशाच मिळाला नसल्याने खोळंबा; इच्छुकांची धाकधूक वाढली
औरंगाबाद महापालिका
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबादः महाराष्ट्रातील 14 महापालिकांमध्ये (Municipal Corporation) पहिल्या टप्प्यात निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) प्रक्रिया सुरु केली आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. मात्र त्यापूर्वी प्रभाग रचना (Ward Formarion) तयार करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने मागील आठवड्यात महापालिकेला दिले होते. महापालिकेने यापूर्वी सादर केलेला आराखडा आयोगाना गृहित धरलेला नाही. मात्र आता नव्याने आराखडा तयार करण्यासाठी आयोगाने महापालिकेला अजून शहराचा नकाश दिलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे नियोजित 17 पर्यंत शहराचा प्रभाग आराखडा तयार करण्यास बराच विलंब होण्याची शक्यता आहे. ही रेंगाळणारी प्रक्रिया पाहून इच्छुकांचीही धाकधूक वाढली आहे.

नकाशा अद्याप नाहीच..

राज्य निवडणूक आयोगाला औरंगाबाद महापालिका निवडणुकीचा आराखडा पाठवण्यासाठी अंतिम तारीख 17 मे आहे. मात्र अद्याप यासाठीचा नकाशा आयोगाकडून मिळालेला नाही. आज हा आराखडा मिळाला तर पुढील प्रक्रिया सुरु होऊ शकते. महापालिका शहराचा प्रभाग रचना आराखडा तयार करण्यासाठी सज्ज आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

यंदा 126 वॉर्ड

राज्य शासनाने यंदा त्रीसदस्यीय प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, तसेच पूर्वीच्या लोकसंख्येच्या तुलनेत 10 टक्के लोकसंख्या वाढ गृहित धरण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, औरंगाबादमधील नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. पूर्वी 115 नगरसेवक मनपात होते. नवीन आराखड्यात 126 नगरसेवक असतील तर प्रभाग संख्या 42 राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

दोन वर्षांपासून प्रशासक राज

महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ 20 एप्रिल 2020 रोजी समाप्त झाला. तेव्हापासून महापालिकेवर प्रशासक राज आहे. दोन वर्षांपासून महापालिकेचा सर्व कारभार प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या हाती आहे. औरंगाबाद निवडणुकीतील प्रभाग रचनेवर आक्षेप घेणारी याचिकाही सर्वोच्च न्यायालयालात प्रलंबित होती. याचा निकालही मागील महिन्यात लागला. त्यामुळे आता पावसाळ्यापूर्वी तरी निवडणूक होईल, असे सर्वांना वाटत होते. इच्छुकांनीही तशी मनाची तयारी केली होती. मात्र ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेण्याची राज्य शासनाची इच्छा नाही. मात्र पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने सूचना केल्यानुसार राज्यातील निवडणुकांची प्रक्रिया सुरु झाली. सध्या 14 महापालिकांचे प्रभाग आराखडे तयार झाले आहते. सूचना आणि हरकतीही मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या पहिल्या टप्प्यातील महापालिकांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर होती. तर दुसऱ्या टप्प्यातील औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकांसाठी इच्छुकांना आणखी वाट पहावी लागणार आहे. आयोगाकडून नकाशा मिळाल्यानंतर प्रभाग रचना आराखड्याची प्रक्रिया सुरु होईल. त्यामुळे इच्छुकांची धाकधूक चांगलीच वाढली आहे.