Aurangabad VIDEO | औरंगाबादेत फाजलपूरा भागात तुफान राडा, मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटात वाद, दगडफेक

| Updated on: Jun 04, 2022 | 1:52 PM

शहरात गेल्या अनेक दिवसांपासून नशेखोरीचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. नागरिक तसेच राजकीय नेत्यांनीही याविरोधात पोलिसांनी कठोर पाऊलं उचलावीत, अशी मागणी केली होती. मात्र अद्याप पोलिसांना या प्रकारावर आळा घालण्यात यश आलेलं दिसत नाहीये.

Aurangabad VIDEO | औरंगाबादेत फाजलपूरा भागात तुफान राडा, मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटात वाद, दगडफेक
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबादः औरंगाबाद शहरातील वाढलेली गुंडगिरी आणि नशेशोरीवर अंकुश लावण्याची मागणी वारंवार समोर येत आहे. त्यातच खून, मारहाणीच्या घटनांची मालिका थांबायचं नाव घेत नाहीये. शुक्रवारी मध्यरात्री फाजलपुरा (Fajalpura) भागातही दोन टोळक्यांमध्ये वाद झाले आणि या वादाचं रुपांतर हाणामारीत  (Aurangabad Rada)झालं. फाजलपुरा भागात रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे काही काळ तणावाचं वातावरण होतं. या घटनेचे व्हिडिओ सध्या औरंगाबादमधील सोशल मीडियात (Viral Video) व्हायरल होत आहेत. रात्रीच्या काळोखात काही तरुण हातात लाठ्या-काठ्या घेऊन आलेले व्हिडिओमध्ये दिसत आहेत. एकजण या सगळ्याचं चित्रीकरण करतेय. हे चित्रीकरण सुरु असताना हॉकीच्या काठ्या हातात घेतलेले तरुण पळून जाताना दिसत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील दोन्ही गटातील तरुणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नशेखोरीतून दगडफेक

सदर घटना शहरातील फाजलपुरा भागात घडली. घटनेत दोन गटांतील तरुणांनी परस्परांवर तुफान दगडफेक केली. त्यानंतर ते हातात काठ्या घेऊन ते एकमेकांना मारण्याच्या तयारीत होते. मात्र काही नागरिकांनी ही माहिती तत्काळ पोलिसांना कळवली. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत दोन गटांतील भांडणात हस्तक्षेप केला. त्यामुळे फाजलपुरा भागातील तणाव निवळला.

हे सुद्धा वाचा

दंगलीचा गुन्हा दाखल

सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. हाणामारी करणाऱ्या आरोपींचा शोध पोलिसांतर्फे घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारे दंगल घडवणारे तरूण नशेबाज होते. नशेच्या अंमलाखाली त्यांनी हा राडा घातला. शहरात गेल्या अनेक दिवसांपासून नशेखोरीचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. नागरिक तसेच राजकीय नेत्यांनीही याविरोधात पोलिसांनी कठोर पाऊलं उचलावीत, अशी मागणी केली होती. मात्र अद्याप पोलिसांना या प्रकारावर आळा घालण्यात यश आलेलं दिसत नाहीये. याच नशेबाजीतून शहरातील गुंडगिरीचं प्रमाणही वाढलं आहे.