औरंगाबादः औरंगाबाद शहरात आधी रस्ते, पाण्याची कामं करून दाखवेन आणि नंतरच शहराचं नाव बदलेन, असं वक्तव्य शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज औरंगाबादमधील सभेत केलं. शहराचं नुसतं नाव बदलून काय उपयोग, ज्या संभाजी राजेंचं नाव शहराला द्यायचंय त्या शहराची बिकट अवस्था असेल तर त्यांना काय वाटेल, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. त्यामुळे मुख्यमंत्री औरंगाबादचं नाव संभाजीनगर (Sambhajinagar) करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचं वक्तव्य शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी (Chandrakant Khaire) केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेत काही तरी मोठी घोषणा होणार, अशी अपेक्षा औरंगाबादकरांना होती. या सभेत उद्धव ठाकरे संभाजीनगरच्या नामांतराची घोषणा करतीलच, अशी आशा लागली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा प्रश्न पुन्हा एकदा टोलवला. आधी भाजपनं शहरातील विमानतळाचं नाव संभाजीनगर विमानतळ असं करावं, त्यानंतर आम्हीच त्यांचा सत्कार करू, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.
”संभाजीनगर कधी करणार? हे त्यांनी सांगायचं का आपल्याला? माझ्या वडिलांनी शिवसेनाप्रमुखांनी वचन दिलं आहे. ते मी कधी विसरणार नाही. पण विचारणाऱ्यांना मला सांगायचं आहे. एक सुरुवात म्हणून विमानतळाचं नाव छत्रपती संभाजीराजे करा असा प्रस्ताव मी दिला आहे. तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा असेल तर या शहराचं नामांतर नाही तर छत्रपती संभाजीराजेंना आदर्श वाटेल असं शहर मी करणार आहे. नाव बदलून चालणार नाही… नावं दिलं आणि पाणी नसेल, नाव दिलं आणि रस्ते नसतील तर संभाजीराजे म्हणतील चल तुला रायगडावरील टकमकटोक दाखवतो….विमानतळाचं नाव संभाजीराजेंच्या नावाने द्या आम्ही तुमचा सत्कार करतो…’
भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ रुपया खाली घसरतोय पण आम्हाला चिंता कोणती तर कोणत्या मशिदीखाली शिवलिंग आहे. आमचं हिंदुत्व मोजण्याची मोजपट्टी तुम्हाला कुणी दिली? चला होऊन जाऊद्या… शिवसेनेनं हिंदुत्वासाठी काय केलं आणि भाजपनं काय केलं हे एकदा खुल्या मंचावर होऊन जाऊद्या… आता फडणवीस सांगत आहेत बाबरी मशिद पाडली तेव्हा शिवसैनिक नव्हते… मग मला सांगा संभाजीनगरचे मोरेश्वर सावे तिकडे गेले नव्हते का… नव्हते गेले तर तुमच्याकडे आलेले त्यांचे चिरंजिव अतुल सावे यांनी सांगावं की मोरेश्वर सावे तिकडे गेले नव्हते… कुणाला हिंदुत्व शिकवताय. बाबरी पडल्यानंतर अडवणी, अटलजी यांचं स्टेटमेंट आहे. हा इतिहास काही वर्षांपूर्वीचा आहे. तेव्हा बाळासाहेबांनी जबाबदारी घेतली नसती, अमरनाथ यात्रेवर गंडांतर आलं, काश्मिरी पंडितांच्या मागे शिवसेनाप्रमुख उभे राहिले नसते… तर दिल्लीच्या तख्तावर आज तुम्ही हिंदुत्वाच्या जोरावर बसले असता काय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.