मुख्यमंत्र्यांचा संयम सुटला, सर्वात जहरी टीका; म्हणाले, बाळासाहेब असते तर जोड्याने…
एकनाथ शिंदे मंत्री होता. आठ मंत्री होते तरी आम्ही सत्तेतून बाहेर पडलो. काँग्रेस राम मंदिरा विरोधात बोलत आहे. अन् हे उद्ध्वस्त झालेले नेते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत.बाळासाहेब ठाकरे यांच स्वप्न मोदींनी पूर्ण केलं. मोदींवर तुम्ही टीका करतात? मोदींच्या नखाची तुम्ही बरोबरी करू शकत नाही. घरी बसून तुम्ही सरकार चालवलं. आपल्या चिरंजीवासाठी त्यांनी दोन दोन आमदारांचे बळी घेतले. पण मी असं कधी करणार नाही.
बुलढाणा | 13 जानेवारी 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीचा राजकारणातील प्रभाव कमी करण्यासाठी तरुणांनी राजकारणात यावं, असं आवाहन केलं होतं. मोदी यांच्या या आवाहनाचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत खरपूस भाषेत समाचार घेतला होता. घराणेशाहीवर घरंदाज माणसानं बोलेलं चांगलं, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. हा समाचार घेताना घरंदाज कोण? आणि कुणाला म्हटलं पाहिजे? याचा अर्थच स्पष्ट केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाण्यात आले होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शिवसेना वाढवण्यासाठी तुमचं योगदान काय आहे? तुम्ही आयत्या बिळात नागोबा झाला. आयत्या पिठावर रेगोट्या मारण्याच काम तुम्ही केलं. कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करण्याचं काम त्यांनी केलं. घरंदाज म्हणजे निवडणूक एकाबरोबर लढायची. लग्न दुसऱ्याबरोबर करायचं आणि हनीमून तिसऱ्यासोबत करायचा. बाळासाहेब असते तर यांना जोड्यानं मारलं असतं. सत्तेसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले. आपल्या सहकाऱ्यांचे गळे घोटण्याचं काम केलं, असा हल्लाबोलच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चढवला.
ना घर का, ना घाट का
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार आहे. काही लोकांनी मोदींवर टीका करून कार्यकर्त्यांचा अपमान केला आहे. काही लोक कार्यकर्त्यांचा अपमान करतात. आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजतात. म्हणून तुमची परिस्थिती न घर का, ना घाट का अशी झाली आहे. तुम्ही आता महाराष्ट्रभर फिरत आहात. आधी फिरले असते तर तुमच्यावर ही वेळ आली नसती, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली आहे.
राजमाता जिजाऊ यांच्या भूमीत मला यायला मिळालं याच मी भाग्य समजतो. हा कार्यकर्ता शिवसंकल्प मेळावा आहे. विराट अशा कार्यकर्त्यांच दर्शन मला झालं. ही लोकसभा निवडणूक आपली पहिली आहे. एवढे लोक जर प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी उतरले तर पुढच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही महायुतीच्या माध्यमातून आपण मिशन 48 हे राबवत आहोत. आज कार्यकर्त्यांचा मेळावा होत आहे. जेव्हा महायुतीचा मेळावा होईल तेव्हा विरोधकांचे पानीपत झाल्याशिवाय राहणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
संख्याबळ महत्त्वाचं
आपण बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे जात आहोत. मी म्हटलं होतं की चिन्ह आणि पक्ष आपल्याला मिळेल. काहीजण छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घ्यायचे आणि वृत्ती अफजलखानाची ठेवायचे. लोकशाह मध्ये संख्याबळ महत्वाचे आहे. विरोधकांचा थयथयाट सुरू झाला आहे. आपण अनेक योजना या सरकारच्या माध्यमातून राबवत आहोत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लेक लाडकी ही योजना सुरू केली. कालच्या कार्यक्रमाला एक लाख महिला आल्या होत्या. स्वातंत्र्याच्या 75 वर्षा नंतर पहिल्यांदाच महिला एवढ्या मोठ्या संख्येने आल्या होत्या, असंही त्यांनी सांगितलं.