‘जलयुक्त शिवार’मुळे मराठवाड्यात महापूर, पर्यावरण तज्ज्ञांचा दावा, फडणवीसांच्या योजनेवर पुन्हा प्रश्न

| Updated on: Sep 30, 2021 | 1:15 PM

मराठवाड्यातील महापुरावरुन आरोप-प्रत्यारोप होत आहेत. महापुराची कारणं शोधताना पर्यावरण अभ्यासक आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारकडे (jalyukta shivar yojana) बोट दाखवत आहेत. 

जलयुक्त शिवारमुळे मराठवाड्यात महापूर, पर्यावरण तज्ज्ञांचा दावा, फडणवीसांच्या योजनेवर पुन्हा प्रश्न
Pradeep Purandare_Devendra Fadnavis_Atul Deulgaonkar
Follow us on

मुंबई : पावसामुळे मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. राज्यात महापूर-ढगफुटीचे थैमान सुरु आहे. त्यानंतर गुलाब चक्रीवादळाने विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात हाहाकार उडवला आहे. गावं जलमय झाली आहे. नद्यांनी पात्रं सोडली आहेत. धरणं भरली आहेत. नाले ओसंडून वाहत आहेत. मराठवाड्यात मोठं नुकसान झालं आहे. आता मराठवाड्यातील महापुरावरुन आरोप-प्रत्यारोप होत आहेत. महापुराची कारणं शोधताना पर्यावरण अभ्यासक आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारकडे (jalyukta shivar yojana) बोट दाखवत आहेत.

जलयुक्त शिवाराच्या कामात मोठ्या प्रमाणात नद्यांशी छेडछाड केल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप पर्यावरणतज्ञ अतुल देऊळगावकर यांनी केला आहे. जलयुक्त शिवार यांच्या कामाची चौकशीची मागणी पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर यांनी केली आहे.

अतुल देऊळगावकर म्हणाले, “जलयुक्त शिवारच्या कामात नद्यांशी छेडछाड केली गेली. नदीचं रुंदीकरण, खोलीकरण, सरळीकरण करणं हे नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करणारं होतं. त्यावेळेलाच महाराष्ट्रातील नामवंत जलतज्ज्ञ पोपटराव पवार, विजय बोराडे, प्रदीप पुरंदरे या सर्वांनी सांगितलं होतं की तुम्ही नदीशी छेडछाड करु नका. आता त्याची फळं आपण भोगत आहे. आपल्याकडे शास्त्रशुद्ध पद्धतीने कोणतीही गोष्ट केली जात नाही. ती थातूर मातूर पद्धतीने केलं जातं. सर्व कामं बिल्डरच्या, गुत्तेदारांच्या हातात आल्यामुळे ते म्हणतील तसं केलं जातं. त्यामध्ये तज्ज्ञांना कोणीही विचारत नाही, त्यामुळे त्याची ही परिणीती आहे”

जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांची प्रतिक्रिया

दरम्यान, ज्येष्ठ जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनीही मराठवाड्यातील पूरस्थितीच्या कारणांपैकी जलयुक्त शिवार एक कारण असल्याचं म्हटलं आहे.

मराठवाड्यात आलेला पूर जलयुक्त शिवार योजनेमुळे आला असं म्हणता येणार नाही, मात्र पूर येण्याला जलयुक्त शिवार योजना हे एक कारण आहे. जलयुक्त शिवार योजनेची कामं चुकीच्या पद्धतीने झाली. अतिखोलीकरण ,रुंदीकरण यामुळे कामात तांत्रिक चुका मोठ्या प्रमाणावर झाल्या. मी आधीपासूनच या कामांवर आक्षेप घेतला होता. मात्र सरकारने केलेल्या चुकांमुळे ही परिस्थिती उद्भवली, असं प्रदीप पुरंदरे म्हणाले.

हवामान बदल ,नद्यांची वहनक्षमता कमी झाली, ही कारणं असली तरी पुराचं एक कारण जलयुक्त शिवार योजना हे सुद्धा आहे, असं जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे म्हणाले.

भाजपचा हल्लाबोल

दरम्यान, अतुल देऊळगावकर यांनी महापुरासाठी जलयुक्त शिवार योजनेकडे बोट दाखवल्यानंतर, भाजपने हल्लाबोल केला. अतुल देऊळगावकर यांना मनोरुग्णालयात पाठवा, जलयुक्त शिवार चांगली योजना आहे, असं भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

शिवाय भाजप आमदार प्रशांत बंब यांनीही जलयुक्त शिवार योजनेवरील आरोप फेटाळले. जलयुक्त शिवार योजनेचा पूरपरिस्थितीशी काहीही संबंध नाही.

हे जलयुक्तमुळे घडलं असतं तर मराठवाड्यात भात शेती करावी लागली असती. मराठवड्यातली पूरपरिस्थिती ही बेसुमार वाळू उपसा यामुळे निर्माण झाली आहे. जलयुक्त शिवार योजना ही दुष्काळात मदत करणारी योजना आहे, असं प्रशांत बंब म्हणाले.

संबंधित बातम्या  

राज ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार द्या, अजित पवार म्हणतात, जरुर, पण एकच अट !