Aurabgabad Weather: शहर परिसरात 7 सप्टेंबरनंतर जोरदार पावसाची शक्यता, पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती

| Updated on: Sep 04, 2021 | 11:42 AM

6 सप्टेंबरला जालना, परभणी, नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ग्यात तुरळक ठिकाणी तर 7,8,9 सप्टेंबर या तीन दिवसाच्या काळात औरंगाबाद, कन्नड, खुलताबाद, फुलंब्री, सिल्लोड, वैजापूर तालुक्यासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी

Aurabgabad Weather: शहर परिसरात 7 सप्टेंबरनंतर जोरदार पावसाची शक्यता, पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती
संग्रहित छायाचित्र
Follow us on

औरंगाबाद: औरंगाबाद शहर, ग्रामीण भाग आणि मराठवाड्यातील परिसरात  गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी पुढच्या  तीन दिवसानंतर जोरदार पावसाचा अंदाज हवामान तज्ञांनी (Rain forecast in Aurangabad, Maharashtra)  वर्तवला आहे.  काही भागात सहा सप्टेंबर तर काही भागात सात सप्टेंबरनंतर जोरदार पावसाला सुरुवात होईल. जिथे पोषक वातावरण तयार झाले आहे, तिथे हा पाऊस तीन ते चार दिवस कायम राहिल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

आज शहराचे तापमान किती?

एमजीएम येथील हवामान विभागाच्या वेबसाईटनुसार, आज शहराचे तापमान 27 अंश सेल्सियसच्या आसपास आहे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 76 % एवढे असून वाऱ्याचा वेग ताशी 10 किलोमीटर एवढा आहे. शहरात आज सूर्यदर्शन झालेले असले तरी काही वेळ ऊन तर काही वेळ शिराळ, असे वातावरण आहे. तसेच बहुतांश ठिकाणी वातावरण ढगाळ दिसून येत आहे.

मराठवाडा परिसरात कसा असेल पाऊस?

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 6 सप्टेंबरला जालना, परभणी, नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ग्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह, वीजेच्या कडकडाटासह पाऊस होईल. फक्त या जिल्ह्यातील ज्या भागात पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झाले आहे, तिथेच असा पाऊस पडेल. उर्वरीत ठिकाणी वातावरण ढगाळ राहून हलक्या स्वरुपाच्या सरी कोसळतील. तसेच 7,8,9 सप्टेंबर या तीन दिवसाच्या काळात औरंगाबाद, कन्नड, खुलताबाद, फुलंब्री, सिल्लोड, वैजापूर तालुक्यासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस तर कुठे मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल.

काढणीच्या पिकांची काळजी घ्यावी

मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाचे वातावरण तयार झाल्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीस आलेल्या उडीद, मूग आदी पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण हवामान विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. के. के. डाखोरे, कृषी शास्त्रज्ञ डॉ. किशोर झाडे यांनी केले आहे.

राज्यात काय आहे पावसाची स्थिती?

भारतीय हवामान विभागाच्या पावसाच्या अंदाजानुसार मुंबईसह राज्यातल्या तुरळक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यात कालही (शुक्रवार) पावसाने बऱ्याच ठिकाणी दर्शन दिलं होतं. आजही विविध ठिकाणी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. मुंबईत तर अगदी पहाटेपासून पाऊस सुरु आहे. मुंबईतील चुनाभट्टी, दादर, लालबाग परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाल्याने तेथे काढणीला आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.  नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झाला आहे त्याचा परिणाम पिकांवर झाला असून जिल्ह्यातील काही भागात तिबार पेरणी करावी लागली आहे. जिल्ह्यात अजून चांगला पाऊस न झाल्याने  पिकाच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम झाला आहे. परिणामी उत्पादन घटल्याने केलेला खर्चही निघणार नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर भात, ज्वारी, मका, कापूस, सोयाबीन आणि मिरचीची लागवड केली जाते. मात्र यंदा अवघा तीस टक्के पाऊस पडल्यामुळे आणि रोजच्या हवामान बदलामुळे पिकांवर याचा परिणाम होत आहे.

इतर बातम्या- 

Aurangabad Gold Rate: लक्ष असू द्या, सोन्याचे दर वाढीच्या दिशेने, पहा औरंगाबाद शहरातले सोन्याचे भाव

Aurangabad Tourism: सिद्धार्थ उद्यानाचे ऐतिहासिक दगडी प्रवेशद्वार पाडले, नव्या कॉम्प्लेक्समधून उद्यानात प्रवेश मिळणार