राज्यातील ८० टक्के शिक्षक भ्रष्ट; भाजपच्या आमदाराचा शिक्षकांवर गंभीर आरोप

सध्या कुणी मटका खेळतो, कुणी गुटखा खातो, कुणी प्लाटिंग करतो, तर कुणी सावकाऱ्या करतो. शिक्षकांच्या सावकाऱ्यांमुळे आत्महत्या होतात.

राज्यातील ८० टक्के शिक्षक भ्रष्ट; भाजपच्या आमदाराचा शिक्षकांवर गंभीर आरोप
| Edited By: | Updated on: Aug 01, 2023 | 4:56 PM

औरंगाबाद : राज्यातील शिक्षकांच्या गुणवत्तेवरून भाजप आमदार प्रशांत बंब यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. औरंगाबादमध्ये शिक्षकांची गुणवत्ता तपासणारी महत्त्वाची परीक्षा पार पडली. या परीक्षेला मराठवाड्यातील ९० टक्के शिक्षकांनी दांडी मारली होती. भाजप आमदार प्रशांत बंब म्हणतात, राज्याचा ढाचा शिक्षणावर अवलंबून आहे. सरकार जास्तीत जास्त पैसे शिक्षकांवर खर्च करतो. शिक्षकांना परीक्षा सांगितल्या होत्या. ८० हजार शिक्षक मराठवाड्यातील होते. त्यापैकी फक्त २० हजार शिक्षकांनी अप्लाय केलं. परीक्षा देताना फक्त अडीच हजार लोकांनी दिली. तुम्ही जे शिकवता ते तुम्ही परीक्षेत लिहा ना, असं थेट आव्हान प्रशांत बंब यांनी दिलं.

तुम्ही जे शिकवता त्याचं उत्तर द्यावं लागेल. सगळी शिक्षण व्यवस्था ही शिक्षकांमुळे बरबटली आहे. २० टक्के शिक्षक चांगले आहेत. ८० टक्के शिक्षक हे मोस्ट करप्टेड आणि बरबटलेले आहेत. याचा अर्थ विद्यार्थी, जनतेबाबत शिक्षक बरबटलेले आहेत. असा गंभीर आरोप प्रशांत बंब यांनी केला.

कुणी गुटखा खातो, तर कुणी सावकाऱ्या करतो

प्रशांत बंब म्हणाले, शिक्षक हे मिल्टरीमॅनसारखे असतात. मिल्ट्रीमॅन पेक्षा त्यांना फार कमी काम करावं लागतं. त्यांना मुख्यालयीचं राहावं लागेल. शिक्षकांना गावात राहून संस्कारमय माहौल बनवायचा आहे. सध्या कुणी मटका खेळतो, कुणी गुटखा खातो, कुणी प्लाटिंग करतो, तर कुणी सावकाऱ्या करतो. शिक्षकांच्या सावकाऱ्यांमुळे आत्महत्या होतात. काही शिक्षकांनी आपल्या नातेवाईकांच्या नावाने बिअरबार घेतलेत. काही शिक्षक हे गावात जात नाही. एखाद्या मुलाला पाच-सात हजार रुपये देतात. त्याला शिकवायला सांगतात. काही शिक्षक हे गावातही जात नाही, असा आरोपही त्यांनी लावला.

तोपर्यंत शिक्षण व्यवस्था व्यवस्थित होणार नाही

मुख्यालयी शिक्षक राहत नाही तोपर्यंत शिक्षण व्यवस्था व्यवस्थित होऊ शकत नाही. काही विद्यार्थ्यांनी पदवी घेतली. पण, त्यांना नोकऱ्या नाही. कारण त्यांचे प्राथमिक शिक्षण डल आहे. मुलाखत योग्य पद्धतीने फेस करू शकत नाही. सरकारी शाळेतील प्राथमिक आणि माध्यमिकचे शिक्षक बरोबर शिकवत नाही. त्यांनी मुख्यालयी राहावे कारण गावातील माहौल संस्कारमय ठेवायचा आहे, असंही प्रशांत बंब यांनी सांगितलं.

त्यांच्या सॅलरी बंद केल्या पाहिजे

शिक्षकांनो, तुमच्या कामाच्या वेळातच काम करायची आहेत ना. जे शिक्षक मुख्यालयी राहत नाही, त्यांच्या सॅलरी बंद केल्या पाहिजे. माझ्या मतदारसंघातील शिक्षक घरभाडेभत्ता घेत नाही. याचा अर्थ तुम्हाला बाहेरून ये-जा करण्याची मुभा मिळालेली नाही. दोन हजार कोटी रुपये खोटे कागदपत्र देऊन उचलत आहेत. शिक्षकांनी असं केलं, तर आपली व्यवस्था ही सुधरू शकत नाही, असंही प्रशांत बंब म्हणाले.