शरद पवार भाजपसोबत येणार का?, चंद्रशेखर बावनकुळे यांचं सूचक विधान; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

2024 पर्यंत उद्धव ठाकरेंकडे केवळ चारच लोक राहतील. बाकीचे सर्व एकनाथ शिंदेंकडे जातील. काही भाजपकडे येतील. त्यामुळे 2024 ला शिल्लक सेना शून्य होणार आहे.

शरद पवार भाजपसोबत येणार का?, चंद्रशेखर बावनकुळे यांचं सूचक विधान; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
chandrashekhar bawankule
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 30, 2023 | 8:24 AM

परभणी | 30 जुलै 2023 : राष्ट्रवादीत फूट पडली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत गेला आहे. तर दुसरा गट असूनही महाविकास आघाडीत आहे. शरद पवार यांनी भाजपसोबत यावं म्हणून अजितदादांच्या गटाकडून दोन वेळा त्यांची मनधरणी केली. पण शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत अस्वस्थता आहेच, पण भाजपमध्येही अस्वस्थता आहे. अजितदादा सोबत आल्याने बळ वाढलं असलं तरी शरद पवार कधीही भाजपची खेळी उधळवून लावू शकतात, हे भाजपलाही माहीत आहे. त्यामुळेच भाजपचं टेन्शन वाढलेलं आहे, असं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळेच भाजप नेत्यांकडून शरद पवार यांच्यावर बोलताना सावध आणि सूचक विधाने केली जात आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना शरद पवार यांच्याविषयी विचारण्यात आले. शरद पवार भाजपसोबत येणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. यावेळी बावनकुळे यांनी सावध आणि सूचक विधान केलं. शरद पवार भाजप सोबत येणार हे आज सांगणे योग्य होणार नाही. काही काळ थांबा वेगळे चित्र तुम्हाला दिसेल, असं सूचक विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.

ते उद्धव ठाकरेंच्या रक्तात

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप हा पक्ष फोडणारा पक्ष असल्याचा आरोप केला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही कधीही कोणाचा पक्ष फोडत नाही. कधी कोणाच्या पक्षात आम्ही डोकावत नाहीत. आमच्याकडे कोणी आला तर कमळाचा दुपट्टा तयार आहे. कोणीही आलं तर आम्ही पक्ष प्रवेश देण्यासाठी तयार आहोत. फोडाफोडीचा उद्योग राज्यात उद्धव ठाकरे यांनी सुरू केलाय. पक्ष फोडणे आणि पाठीत खंजीर खुपसणे हे उद्धव ठाकरे यांच्या रक्तात आहे, असा हल्ला बावनकुळे यांनी केला.

तर चांगले दिवस येतील

2024 पर्यंत उद्धव ठाकरेंकडे केवळ चारच लोक राहतील. बाकीचे सर्व एकनाथ शिंदेंकडे जातील. काही भाजपकडे येतील. त्यामुळे 2024 ला शिल्लक सेना शून्य होणार आहे. उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा पक्ष सांभाळावा. लोक सोडून चालले त्याकडे लक्ष द्यावं. फेसबुक लाइव्ह करणे, घराच्या घरात इंटरव्ह्यू देणे यापेक्षा उद्धव ठाकरे लोकांमध्ये गेले तर त्यांच्या पक्षाला चांगले दिवस येतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

आम्ही संन्याशी नाही

ज्याप्रकारे उद्धव ठाकरे वागत आहेत. अजूनही त्यांना महाराष्ट्र कळलेला नाही. 9 वर्षात मोदीजींनी देशासाठी जे केलं, एकनात शिंदे, फडणवीस आणि अजितदादा 13 कोटी जनतेसाठी जे विकासाचं काम करतायेत त्यामुळे पक्षप्रवेश होत आहे. ज्याप्रकारे भाजपमध्ये पक्षप्रवेश होत आहे त्याची उद्धवजींनी चिंता केली पाहिजे. लोक आमच्याकडे आले तर आम्ही घेणारच. आम्ही काही संन्याशी नाही, असंही ते म्हणाले.