औरंगाबाद: पंढरपूर येथे आषाढी महोत्सवात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या पैठणच्या शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या (Eknath Maharaj) भव्य पालखीसाठी गोदावरी नदीवर 35 कोटींचा पूल व अडीच किलोमीटरचा (Bridge on Godavari river) सुसज्ज रस्ता बांधणार असल्याचे आदेश, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी दिले आहेत. या पूल आणि रस्त्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. हा पूल बांधण्यासाठीचा नियोजन आराखडा सार्वजनिक बांधकाम खात्याकडे (PWD Department) सुपूर्द केल्याची माहितीदेखील नुकतीच मिळाली आहे. संपूर्ण मराठवाड्याच्या दृष्टीने या पालखी सोहळ्याला विशेष महत्त्व आहे.
पैठण येथील शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या पालखीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. लाखो साधुसंत, सुफी संत, वारकरी मंडळींचे हे श्रद्धास्थान आहे. हजारोंच्या संख्येने इथले भाविक आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथील महोत्सवात सहभागी होण्यासाठी पालखी काढत असतात. या पालखीला चनवाडी येथील गोदावरी नदीवरील खडतर अशा रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाविरुद्ध नाथ महाराजांच्या भक्तांमध्ये नाराजी होती.
पालखीचा हा त्रासदायक रस्ता दुरुस्त करण्याची किंवा नवा रस्ता बांधण्याची मागणी नाथभक्तांनी नामदार संदीपान भुमरे यांनी केली होती. तसेच ओटा परिसरातील गोदावरी नदीवर जुने कावसान ते अहमदनगर जिल्ह्याला जोडणारा सुसज्ज असा पूल तसेच रस्ता बांधण्याचा आग्रहदेखील नाथभक्तांनी धरला होता. या मागणीची दखल संदीपान भुमरे यांनी घेतली. तसेच पैठण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राजेंद्र बोरकर यांना राज्य शासनाकडे नाथांच्या पालखीसाठी गोदावरी नदीवर सुसज्ज असा पूल आणि तीन किलोमीटर रस्त्यासाठीचा नियोजनबद्ध कृती आराखड्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.
मंत्री संदीपान भुमरे यांच्या आदेशावरून सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राजेंद्र बोरकर यांनी नवीन पूल आणि रस्त्याच्या बांधकामाचा नियोजनबद्ध प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवला असल्याची माहिती बोरकर यांनी नुकतीच पत्रकारांशी बोलताना दिली. संदीपान भूमरे यांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत नाथभक्त वारकरी संप्रदायाकडून केले जात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संत एकनाथ महाराज यांच्या पालखी दिंडीचे यंदाच्या जुलै महिन्यात पंढरपूरकडे औपचारिकच प्रस्थान झाले. मोजकेच भाविक, वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. गोदाकाळी नाथांच्या समाधी मंदिरात 18 दिवस प्रस्थान सोहळा साजरा झाला. शासनाने ठरूवून दिल्यानुसार, 19 जुलैला राज्य परिवहन मंडळाच्या दोन बसने पालखी सोहळा आषाढी एकादशी यात्रेसाठी पंढरपूरला रवाना झाला.
इतर बातम्या-
कोरोनातील कंत्राटी डॉक्टरांची फसवणूक, मानधन ठरले 50 हजार, महापालिका म्हणते 30 हजारच घ्या