अकोला : राज्यात सध्या भोंग्याचा वाद शिगेला पोहोचला आहे. अशातच आता बच्चू कडू (Bacchu Kadu) विना भोंग्यांची निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. चिन्हं माहिती होण्यासाठी फक्त एक दिवस भोंगा वाजणार, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच भोंगे बंद करायचे तर सर्वच करा, असे वक्तव्यही त्यांनी केले आहे. एकिकडे मशीदीवरील भोंग्यांवरून मनसेने रान पेटलं असताना बच्चू कडू (Loudspeaker Row) यांनी अशी भूमिका घेतल्याने आता पुन्हा राजकीय चर्चांणा उधाण आले. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) भोंग्याचा मुद्दा उचलून धरल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी यावर सडकून टीका करण्यास सुरूवात केली आहे. भाजप मात्र या भूमिकेचं खुलेपणे समर्थन करत आहे. अशातच आता बच्चू कडू यांनी निवडणुकीतही भोंग न लावण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले, मंदिर,मशीदमधले भोंगे बंद कराल तर सर्वच भोंगे बंद करावे लागतील. मात्र सर्वात जास्त त्रास राजकीय भोंग्याचा होतो ते आधी बंद करा, असे आवाहनही त्यांनी करून टाकलं आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत बच्चू कडू एकच दिवस भोंगा वाजवणार बाकी दिवस विना भोंग्याचा प्रचार करणार, हे आता स्पष्ट झालं आहे. मात्र प्रत्यक्ष निवडणूक लागल्यावरच हे किती पाळलं जातं कळेल. सध्या राज्यात यावरून जोरदार राजकीय वादंग सुरू आहे. या मुद्द्यावरून भाजप आणि महाविकास आघाडी आमनेसामने आले आहे. राज्यात दंगली भडकावण्याचा भाजपचा डाव आहे. आणि त्यांना या माध्यमातून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची आहे, असा आरोपही आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येतोय.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. अनधिकृत भोंग्यांबाबत पोलिस आयुक्त निर्णय घेतील, तसेच कोणत्याही परिस्थितीला सामोर जायला मुंबई पोलिस सक्षम आहेत. पोलिसांनी आज चांगल उत्तम बंदोबस्त ठेवला. तसेच सर्व समाजातील लोकांनी सहकार्य केलं. तसेच गाईडलाईनच पालन केल आहे. हे असच सुरु राहील, अशी प्रतिक्रिया या वादावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
मंत्री विजय वडेट्टीवर यांनी यावरून राज ठाकरेंवर टीका केली आबहे. ज्या पद्धतीने राज ठाकरे सरसावले मला वाटतं त्यांना जनता कधी माफ करणार नाही. या राज्यात अचानक उठून कुणीतरी भोंगे विषय काढावा हे लोकांना मान्य नाही. खोटं बोलायची सवय आता त्यांनी सोडून द्यावी. टिळकांचा नातू येऊन विरोध करतो. जे जेम्स लेनचे समर्थन करतात त्यांना राजकारणातून जनता हद्दपार करेल. जातीयवादी कोण आहे हे राज्याने पाहिले. सुपारी बाज कोण आहे हे लोकांना माहिती. राज ठाकरे यांची भूमिका तरुणांना खड्ड्यात टाकणारी आहे, अशी टीका वडेट्टीवर यांनी केली आहे.