विधान परिषदेसाठी शिवसेनेचा उमेदवार कोण ? एकनाथ शिंदे यांनी बोलावली तातडीची बैठक, मोठी खलबते
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधान परिषदेची आमदारकी देण्यासंदर्भात बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे यांच्यात आज रात्री बैठक होणार असल्याचे म्हटले जात आहे.

राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणूकीसाठी येत्या ३० एप्रिल रोजी अंतिम नावांची घोषणा होणार आहे. राज्यातील ९ विधानसभेच्या जागांपैकी ६ जागा भाजपाच्या वाटल्याला आल्या आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वतीने माजी उपसभापती नीलम गोऱ्हे ( Neelam Gorhe ) आणि बच्चू कडू ( Bacchu Kadu ) यांच्या नावावर चर्चा सुरु असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात या संदर्भात आज रात्री बैठक होणार असून त्यात अंतिम मोहर उमटवली जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी विधान परिषदेवर आमदार म्हणून जाण्यासाठी शिवसेनेची मनधरणी केल्याचे म्हटले जात आहे. मात्र, बच्चू कडू यांनी त्यांचा प्रहार जनशक्ती पक्ष ( Prahar Janshakti Party ) शिवसेनेतून विलीन करावा यावरच त्यांना आमदारकी द्यावी अशी मागणी शिवसेनेतून होत आहे.मात्र, केवळ विधान परिषदेतील आमदारकीसाठी बच्चू कडू यांनी आपला पक्ष शिवसेनेत विलीन करु नये अशी भूमिका कडू यांच्या पक्षातील कार्यकर्ते करत आहेत. आज रात्रीत एकनाथ शिंदे यांच्या सोबत बच्चू कडू यांची या संदर्भात चर्चा होणार असून अंतिम निर्णय होणार असल्याचे म्हटले जात आहे.
कोणाला संधी मिळणार
विधान परिषदेचे ९ आमदार निवृत्त होत असून त्यांच्या रिक्त झालेल्या जागी येत्या १२ मे रोजी निवडणूक होत आहे. विधान परिषदेत निवडून येण्यासाठी एका उमेदवाराला २८ मतांचा कोटा गरजेचा आहे. शिवसेनेचे विधानसभेतील संख्याबळ ५७ असून विधान परिषदेची दुसरी जागा निवडून येण्यास कोणतीही अडचण नसल्याचे म्हटले जात आहे. विधान परिषद निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल आहे. त्यामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे, बच्चू कडू आणि शीतल म्हात्रे यांच्या पैकी कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.