भटक्या विमुक्तांना अनुसूचित जमातीत आरक्षण द्या; ठाण्यात ‘डफली बजाव’ आंदोलन
बंजारा आरक्षण किंवा क्रिमीलेयर, बढतीमधील आरक्षण, तांडा सुधार प्रश्नावर गोराबंजारा समाज गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहे. मात्र, या संघर्षाची दखल घेतली जात नसल्यानेच आज डफली बजाओ आंदोलन करण्यात आले.
ठाणे: भटक्या विमुक्त समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी बजारा समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डफली बजाव आंदोलन करण्यात आले. बंजारा समाजाचे नेते, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता. (dafli bajao agitation for reservation in maharashtra)
बंजारा आरक्षण किंवा क्रिमीलेयर, बढतीमधील आरक्षण, तांडा सुधार प्रश्नावर गोराबंजारा समाज गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहे. मात्र, या संघर्षाची दखल घेतली जात नसल्यानेच आज हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बंजारा समाजातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’ अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.
ऑल इंडिया बंजारा संघ, राष्ट्रीय भटके विमुक्त मागासवर्गीय महासंघाच्या वतीने हे आंदोलन सबंध महाराष्ट्रात करण्यात आले आहे. क्रिमेलेयरमधून बंजारा आणि भटके विमुक्त समाजाला वगळले पाहिजे, ही आमची मागणी आहे. वास्तविक ही बाब कायदेशीर आहे. पण, मंत्रालयात मूर्ख अधिकारी बसले आहेत. त्यांना काहीही कळत नाही. त्यामुळेच बढत्यांमधील मागासवर्गीयांचे आरक्षण थांबलेले आहे. ते सुरु करावे. केंद्रामध्ये जसे धनगर समाज एसटीचे आरक्षण मागत आहे. तसेच, आरक्षण आम्हाला देण्यात यावे. त्यासाठी एसटीमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवून आम्हालाही या आरक्षणाचा लाभ द्यावा. धनगर समाजालाही आरक्षण देण्यात यावे, असं राठोड यांनी सांगितलं.
या आंदोलनात भटके विमुक्त मागासवर्गीय महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अप्पासाहेब भालेराव, मुंबई अध्यक्ष अमित साळुंखे, ठाणे अध्यक्ष रामदास राठोड, जनाबेन राठोड, मिना राठोड, मिना राठोड, लाला चव्हाण, रवी राठोड, रमेश राठोड, हरी चव्हाण, लक्ष्मण राठोड, पुरीण राठोड, सुंदर भाईं अशोक पवार, शंकर राठोड, गोपाळ पवार आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
तर महिन्याभरात मराठा समजाला आरक्षण
मराठा आरक्षणाचा प्रश्न जटील झाला होता. मात्र, आता तो सुटत आलेला आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात तिन्ही राजे, राष्ट्रवादीच सर्वेसर्वा शरद पवार, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस, विविध संघटना यांच्याशी सल्लामसलत करुन एकमत झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. तुम्हाला मी विश्वासाने सांगतो की, एक महिन्याच्या आत हा प्रश्न सुटणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत आमचा अभ्यास नाही, असे विधान केले आहे. पण, त्यांना आम्ही हे सांगतो की तुम्ही जरी लॉयर असलात तरी आम्ही लॉ मेकर आहोत. त्यामुळे आम्हाला शिकवू नका, असा टोला राठोड यांनी लगावला. (dafli bajao agitation for reservation in maharashtra)
पालघरमध्येही आंदोलन
ठाण्यापाठोपाठ पालघर येथेही राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटनेने जिल्हाध्यक्ष रवी राठोड यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयासमोर डफली बजाव आंदोलन केले. पालघर तहसीलदार कार्यालयासमोर डफली वाजवत बंजारा समाजाच्या प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी आंदोलकांनी पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे यांना मागण्यांचे निवेदनही दिले.
संबंधित बातम्या:
Maratha Reservation ! मला चर्चेला बोलवा, एका महिन्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवेल; हरिभाऊ राठोड यांचा दावा
उदयनराजेंना परत राजेशाही आणायची आहे काय?, हरिभाऊ राठोडांचा सवाल
काँग्रेसच्या हरिभाऊ राठोडांची मोदींवर शेलक्या भाषेत टीका
(dafli bajao agitation for reservation in maharashtra)