यांना आई-वडील नाहीत, आजोबांकडे सोडा…; आई प्रियकरासोबत पळाली अन् आजोबांनी…बीडमधील धक्कादायक प्रकार!

प्रियकरासाठी एका आईने आपल्या दोन चिमुरड्यांना पंढरपूर-संभाजीनगर बसमध्ये बेवारस सोडल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. आजोबांनीही नातवांना नाकारले आहे.

यांना आई-वडील नाहीत, आजोबांकडे सोडा...; आई प्रियकरासोबत पळाली अन् आजोबांनी...बीडमधील धक्कादायक प्रकार!
beed
| Updated on: May 20, 2026 | 11:03 AM

बीडमध्ये नात्यांना काळिमा फासणारी आणि माणुसकीला चक्रावून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीने सोडलेल्या महिलेने आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी पोटच्या दोन निष्पाप मुलांना एसटी बसमध्ये बेवारस सोडून दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यावेळी मुलांच्या खिशात एक चिठ्ठी ठेवून यांना आई-वडील नाहीत, यांना यवतमाळला पोहोचवा, असे लिहून त्यांच्या आईने पळ काढला. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या आजोबांच्या स्वाधीन पोलिसांनी या मुलांना करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी नातवांना जवळ घेण्याऐवजी मुलीने पळवून नेलेली स्कूटी आणि पैशांची चौकशी सुरू केली. त्यामुळे रक्ताच्या नात्यांमधील क्रूरता समोर आली आहे.

काय आहे नेमकी घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या दोन लहान मुलांसह राहत होती. काही दिवसांपूर्वी तिचे बीडमधील एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळले. तिने तिच्या या प्रियकरासोबत पळून जाण्याचा प्लॅन आखला. यासाठी तिने पंढरपूर-संभाजीनगर या एसटी बसचा थरार निवडला. ती मुलांना घेऊन बसमध्ये बसली. मात्र बीड परिसरात आल्यानंतर तिने मुलांना बसमध्येच सोडून दिले. यानंतर बाहेर उभ्या असलेल्या प्रियकरासोबत तिने स्कूटीवरून पळ काढला.

तिने पळून जाण्यापूर्वी मुलांच्या खिशात एक चिठ्ठी ठेवली होती. या चिठ्ठीवर “या मुलांना आई-वडील नाहीत. यांना यवतमाळच्या बसमध्ये बसवून द्या.” असे लिहिले होते. विशेष म्हणजे, या चिठ्ठीवर तिने आजोबांचा मोबाईल नंबर लिहिला होता. यानंतर बस पुढे जात असताना दोन्ही लहान मुले आई जवळ नसल्याने मोठ्याने रडू लागली. बसमधील कंडक्टरने मुलांची चौकशी केली असता त्यांच्याजवळ कोणीही नव्हते. शोध घेतला असता मुलांच्या खिशात ती चिठ्ठी सापडली.

यानंतर कंडक्टरने तात्काळ बीड पोलिसांशी संपर्क साधत मुलांना त्यांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी चिठ्ठीवरील नंबरवरून तात्काळ यवतमाळ येथे राहणाऱ्या मुलांच्या आजोबांशी संपर्क साधला आणि त्यांना बीडला बोलावून घेतले. त्या मुलांचे आजोबा बीडमध्ये आल्यानंतर आणखी एक धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. पोटच्या मुलीने मुलांना रस्त्यावर सोडले म्हणून आजोबा नातवांना छातीशी कवळतील अशी पोलिसांना अपेक्षा होती. मात्र, तिथे आल्यानंतर या आजोबांनी नातवांना ओळखण्यास किंवा जवळ घेण्यास नकार दिला. उलट, माझ्या मुलीने घरातून पळवून नेलेली स्कूटी आणि रोख रक्कम कुठे आहे? याची चौकशी त्यांनी पोलिसांकडे केली. मुलीच्या वडिलांनी ३० एप्रिल रोजीच यवतमाळ पोलिसात आपली मुलगी स्कूटी आणि रोख रक्कम घेऊन पळून गेल्याची तक्रार दाखल केली होती.

चिमुरड्यांचा ताबा ‘शिशुगृहाकडे’

दरम्यान याप्रकरणी पोटच्या आईने प्रियकरासाठी सोडून दिले आणि रक्ताच्या आजोबांनीही नातवांना स्वीकारण्यास नकार दिला. शेवटी प्रशासनाने या दोन्ही चिमुरड्यांची जबाबदारी स्वीकारली. सध्या या दोन्ही मुलांचा सांभाळ बीड येथील शासकीय शिशुगृहात केला जात आहे. पोलीस आता त्या फरार माता आणि तिच्या प्रियकराचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे बीड आणि यवतमाळ जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे.

Follow Us