मोठी बातमी ! उज्ज्वल निकम हे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत?; आज होणार फायनल निर्णय, वाल्मिकचा दोष मुक्तीचा अर्ज फेटाळला

Ujjwal Nikam : महाराष्ट्रातील नामांकित सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी संतोष देशमुख खून खटल्यात जोरदार बाजू मांडली. पण आता ते ही केस पुढे लढतील का? असा प्रश्न विचारल्या जात आहे. त्यामागे एक मोठे कारण पण आहे.

मोठी बातमी ! उज्ज्वल निकम हे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत?; आज होणार फायनल निर्णय, वाल्मिकचा दोष मुक्तीचा अर्ज फेटाळला
संतोष देशमुख खून खटल्यात आरोपींना दणका
| Updated on: Jul 22, 2025 | 12:30 PM

महाराष्ट्रातील नामांकित सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बीडमधील संतोष देशमुख खून खटल्यात हिरारीने बाजू मांडली. आरोपींविरोधात त्यांनी जोरदार युक्तीवाद केला. आज बीड कोर्टासमोर आरोपी वाल्मिक कराडसह इतर जणांनी दोष मुक्तीचा अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला. तर उज्ज्वल निकम हा खटला पुढे लढवतील का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. त्यामागे एक प्रमुख कारण आहे. काय आहे ते कारण?

संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची आरोपींनी निर्घृण हत्या केली होती. प्रकरणात सुरुवातीलाच नाही तर प्रकरण उघड झाल्यानंतर ही पोलिस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघड झाले होते. प्रकरणात विरोधकांनी आणि जनतेने लढा दिल्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले. अनेक पोलिसांची बदली झाली. तर याप्रकरणाचे धागेदोरे वाल्मिक कराडपर्यंत असल्याचे व्हिडिओ, फोटो आणि मोबाईलच्या संबंधातून पुढे आले. प्रकरणात राज्य सरकारने उज्ज्वल निकम यांना बाजू मांडण्याची विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात त्यांनी आरोपींविरोधात जोरदार युक्तीवाद केला.

राज्यसभेवर निकम यांची वर्णी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता त्यांच्या नावासमोर खासदार ही उपाधी लागणार आहे. त्यांनी पाकिस्तानचा दहशतवादी अजमल कसाब खटला आणि राज्यातील इतर गाजलेल्या खटल्यात कायदा क्षेत्रातील त्यांच्या अभ्यासाची चुणूक दाखवली आहे. आता खासदार असताना संतोष देशमुख खून खटल्यात बाजू मांडता येईल का, असा सवाल करण्यात येत आहे. कायदा तज्ज्ञांशी चर्चा करून याविषयी निर्णय घेणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच सांगितले आहे. तर काही राज्यसभेचे खासदार जे विधीज्ञ आहेत, ते कोर्टात बाजू मांडत असल्याने निकम हे पण तोच मार्ग निवडतील अशीही चर्चा आहे.

वाल्मिकचा अर्ज फेटाळला

संतोष देशमुख खून प्रकरणातील सर्व आरोपींनी दोष मुक्तीसाठी अर्ज केले होते. यापुर्वी वाल्मीक कराडने दोष मुक्तीसाठी अर्ज केला होता. वाल्मीक कराडने जामीनासाठी अर्ज केला होता. त्याचा अर्ज बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला. आरोपी दोष मुक्तीसाठी स्वतंत्र अर्ज करुन कोर्टाचा वेळ वाया घालवत असल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर आरोपींचे दोष मुक्तीचे अर्ज फेटाळण्यात आले. संपत्ती जप्तीच्या अर्जावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे. प्रकरणात 4 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होईल.