पावसाच्या पहिल्याच दणक्याने मध्य रेल्वेची दाणादाण, रेल्वे ट्रॅकखालची माती गेली वाहून, रेल्वे विस्कळीत

पावसाने खडी वाहून गेल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. कल्याणच्या पुढे शहाड, आंबिवली, टिटवाळापासून कसारापर्यंत सर्वच रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळली आहे. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

पावसाच्या पहिल्याच दणक्याने मध्य रेल्वेची दाणादाण, रेल्वे ट्रॅकखालची माती गेली वाहून, रेल्वे विस्कळीत
Between Wasid and Shahapur, rain washed away the soil under the tracks of the Central Railway
Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jul 07, 2024 | 2:38 PM

जून महिन्यात  दडी मारुन बसलेल्या पावसाने रविवारी पुन्हा कमबॅक केले आहे. या पावसाने अनेक नद्यांना पूर आला आहे. आटगाव रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे ट्रॅकखालील माती वाहून गेल्याने ओव्हरहेड वायरच्या खांबांचा आधारच नष्ट झाल्याने  रेल्वे सेवेचा बोजवारा उडाला आहे. मध्य रेल्वेची कसारा दिशेने जाणारी डाऊन मार्गाची  वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे रविवारचा मेगाब्लॉकने आधीच त्रस्त असलेल्या मुंबईकरांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

पावसाच्या जोरदार सरींनी मध्य रेल्वेचा बोजवरा उडाला आहे. वाशिंद, खडवली आणि आटगाव दरम्यान रेल्वे ट्रॅकखालील माती वाहून गेली आहे. आटगाव रेल्वे स्थानकाजवळ झाडे देखील  कोसळली आहे. तसेच काही ठिकाणी रेल्वे रुळावर माती आल्याने कल्याणहून कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने मुंबई आणि बदलापूर आणि कल्याण परीसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे.

शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. आज पहाटेच्या सुमारास आटगाव रेल्वे स्थानकाजवळ झाडे कोसळले आहे. रविवारी पहाटे सहा वाजेपासून कल्याणवरुन कसाऱ्याकडे जाणारी रेल्वे विस्कळीत झाली असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.  मुसळधार पावसाने अनेक सखल भागात पाणी रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे.

मेगाब्लॉक रद्द केला

वासिंद रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरचा पोल खचल्याने वीज पुरवठा  बंद झाला आहे. त्यामुळे वासिंद-कसाऱ्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. रविवारी विशेष मेगाब्लॉक रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येतो. मात्र मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने मेगा ब्लॉकदेखील रद्द करण्यात आला आहे. मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने कल्याणच्या पुढे शहाड, अंबिवली, टिटवाळापासून कसारापर्यंत सर्वच रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळली आहे. दरम्यान, कल्याण-कसारा मार्गावरील रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरु व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू असून प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली