दरवर्षी मंदिरात पूजा व्हायची, यंदा बॅक वॉटरने परिसरात पाणीच पाणी, तरीही भक्तांनी अशी केली पूजा

आता या मंदिर परिसरात गोसेखुर्द धरणाच्या बॅक वॉटरचे पाणी साचते. त्यामुळे हनुमान जयंती कशी साजरी करणार असा भक्तांसमोर प्रश्न होता. पण, भक्तीभाव लक्षात घेता प्रशासनाने भाविकांना मदत केली.

दरवर्षी मंदिरात पूजा व्हायची, यंदा बॅक वॉटरने परिसरात पाणीच पाणी, तरीही भक्तांनी अशी केली पूजा
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Apr 07, 2023 | 3:17 PM

भंडारा : गोसेखुर्द धरणात पाणी साठवण्यात येत आहे. यामुळे आजूबाजूच्या गावांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सुरुवातीला जिथं पाणी राहत नव्हते तिथं पाणी साचून राहू लागले. यामुळे काही गावांना स्थलांतरित करावं लागलं. याच परिसरात एक हनुमानाचं मंदिर आहे. या मंदिरात हनुमान जयंतीला मोठी यात्रा भरत असे. मोठ्या प्रमाणात भाविक येत असतं. पण, आता या मंदिर परिसरात गोसेखुर्द धरणाच्या बॅक वॉटरचे पाणी साचते. त्यामुळे हनुमान जयंती कशी साजरी करणार असा भक्तांसमोर प्रश्न होता. पण, भक्तीभाव लक्षात घेता प्रशासनाने भाविकांना मदत केली.

सुरुवातीला मंदिरात जाण्यापासून रोखले

जिल्ह्यातील श्रीक्षेत्र अंभोरा (मोदी) येथील वैनगंगा नदीच्या काठावर प्राचीन पंचमुखी हनुमान मंदिर आहे. हनुमान जयंती असल्यामुळे मंदिराचे पुजारी भाविकांसह मंदिराची साफसफाई करण्यासाठी डोंग्याने जाण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात त्यांना अड्याळ पोलिसांनी रोखून मंदिरात जाण्यापासून मज्जाव केला.

दबाव लक्षात घेता सहकार्य केले

मात्र वाढता दबाव लक्षात घेता पोलिसांनी स्वता मंदिरात बोटीने घेऊन जात हनुमंताची पूजा करवून आणली आहे. सध्या या मंदिराच्या चारही बाजूने गोसेखुर्द धरणाचे पाणी साचले आहे. या आधी मंदिर परिसरात मोठी यात्रा भरायची. मात्र आता मंदिराच्या चारही बाजूला पाणी असल्यामुळे भाविकांची वर्दळ कमी झाली आहे.

मंदिरापर्यंत रस्ता बांधण्याची मागणी

मंदिरालगतच नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र मंदिरात जाण्यासाठी रस्ता बनविण्यात आला नाही. त्यामुळे मंदिरात नावेच्या सहाय्याने भाविकांना जावे लागते. या मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता बांधून देण्याची मागणी केली जात आहे.

तर जल आंदोलनाचा इशारा

दुसरीकडे मंदिरात जाण्यापासून रोखण्याचा आमचा हेतू नाही. मात्र बोटीतून नदी पार करणे धोकादायक असल्याने हे पाऊल उचलण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. भाविकांनी रस्ता बनवण्याची मागणी केली आहे. रस्ता बनवून दिला नाही तर जल आंदोलन करण्याचा इशारा हनुमान भक्त सुभाष आजबले यांनी दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us