सहा महिन्यांपूर्वी एकुलता एक मुलगा गेला, फवारणी करताना हार्ट अटॅकने शेतकरी पित्याचा मृत्यू

| Updated on: Mar 07, 2022 | 10:31 AM

स्वतःच्या मालकीच्या शेतात उन्हाळी धान पिकावर खत फवारणी करत असताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने भोवळ येऊन खाली पडल्यानंतर शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

सहा महिन्यांपूर्वी एकुलता एक मुलगा गेला, फवारणी करताना हार्ट अटॅकने शेतकरी पित्याचा मृत्यू
भंडाऱ्यात शेतकऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
Follow us on

भंडारा : पिकावर खत फवारणी करताना हृदयविकाराचा धक्का (Heart Attack) बसल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. भंडारा (Bhandara) जिल्ह्यात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच शेतकऱ्याच्या (Farmer) मुलाचा मृत्यू झाला होता. एकामागून एक दोघे कर्ता पुरुषच गेल्याने कुटुंबाचा आधारवड कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन विवाहित मुली असा परिवार असल्याची माहिती आहे. श्रीराम आत्माराम धोटे असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते 60 वर्षांचे होते. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव-कोहळी येथील शेत शिवारात ही घटना घडली.

नेमकं काय घडलं?

स्वतःच्या मालकीच्या शेतात उन्हाळी धान पिकावर खत फवारणी करत असताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने भोवळ येऊन खाली पडल्यानंतर शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्याच्या पिंपळगाव/कोहळी येथील शेत शिवारात घडली आहे. श्रीराम आत्माराम धोटे (वय 60 वर्ष) (रा. पिंपळगाव /कोहळी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

शेतकऱ्याचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांकडून वर्तवण्यात आला आहे.

खताच्या फवारणीसाठी शेतात

पिंपळगाव/कोहली येथील श्रीराम आत्माराम धोटे यांनी इटियाडोह बाघ प्रकल्प सिंचन योजने अंतर्गत सव्वा एकरात उन्हाळी धान पिकाची लागवड केली होती. याच गावातीलच पंढरी नकटू कोड्डे यांच्यासोबत धान पिकावर खताची फवारणी करण्यासाठी ते सायकलने खत घेऊन गेले होते.

भोवळ येऊन कोसळले

शेतात खत फवारणी करत असताना अचानक श्रीराम धोटे यांना भोवळ आली आणि ते खाली पडले. याची माहिती मिळताच पंढरी कोड्डे त्यांना पाणी पाजण्यासाठी गेला, मात्र श्रीराम धोटे यांचा जागीच मृत्यू झाला होता.

हार्ट अटॅक आल्याचा अंदाज

या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली, यावरुन पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. लाखांदूर येथे शवविच्छेदन करून मयत शेतकऱ्याचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आला आहे. शेतकऱ्याचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

सहा महिन्यांपूर्वी मुलाचा मृत्यू

अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच श्रीराम धोटे यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. आता कर्ता पुरुषच गेल्याने त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन विवाहित मुली असं कुटुंब आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

दोघा तरुण लेकरांचे घरात मृतदेह, पोलीस येताच आई दार लॉक करुन निघाली, अपघात की घातपात?

सुट्टीवर आलेल्या CRPF जवानाचा आनंद क्षणात लोपला, सिमेंटचा पिलर कोसळून लेकीचा करुण अंत

गवताच्या गंजीत होरपळून एकाचा होरपळून मृत्यू; नाशिकमधली काळजाचा थरकाप उडवणारी घटना