भाजपनं काँग्रेसचं कार्यालय फोडलं, पोलिसांनी कार्यकर्त्यांना चोपलं, नेमकं काय घडलं?

मुंबईत भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं कार्यालय फोडलं. त्यानंतर पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. यामुळे चांगलाच गोंधळ उडाला.  

भाजपनं काँग्रेसचं कार्यालय फोडलं, पोलिसांनी कार्यकर्त्यांना चोपलं, नेमकं काय घडलं?
| Updated on: Dec 19, 2024 | 9:28 PM

आज मुंबईमध्ये जोरदार राडा झाला, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. मात्र दुसरीकडे मुंबईत भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं कार्यालय फोडलं. त्यानंतर पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. यामुळे चांगलाच गोंधळ उडाला.

काँग्रेसनंच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचं सांगत. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत काँग्रेसंच कार्यालय फोडलं. कार्यालयात शिरुन भाजपच्या कार्यकर्त्यांनी अक्षरश: तोडफोड केली. मोठ्या संख्येनं भाजपच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयावर हल्ला केला. पोस्टरवर शाईफेक केली आणि कार्यलायतल्या खुर्च्याही मोडल्या.  यानंतर पोलिसांनीही, तोडफोड करणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. पोलिसांनी या हल्लेखोर कार्यकर्त्यांना लाठीनं चांगलाच चोप दिला. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अक्षरश: पळवू पळवू मारलं.

एकीकडे काँग्रेसनं डॉ. आंबेडकरांचा अपमान केल्याचं सांगत भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालय फोडलं तर ज्या पद्धतीनं भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला, त्यावरुन वडेट्टीवारांनी हे भाजपचे गुंड असल्याचा संताप व्यक्त केला.

सध्या अमित शाहांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील फॅशन आणि स्वर्ग या वक्तव्यावरुन विरोधक आक्रमक झालेत. अमित शाहांच्या विरोधात आंदोलनं सुरु झाली आहेत.  मात्र दुसरीकडे काँग्रेसनंच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचं सांगत भाजपकडून काँग्रेसच्याच मुंबईच्या कार्यालयची तोडफोड करण्यात आली.

दरम्यान यावर आता काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वाक्याला आमचा आक्षेप होता, आमची मागणी होती की त्यांनी माफी मागावी.  मात्र आमच्या मुंबई कार्यालयावर जो हल्ला झाला तो भ्याड हल्ला आहे. त्याचा मी निषेध करते. राज्यामध्ये गृह खाते आहे का, कायदा सुव्यवस्था आहे का ? लाडकी बहिणी योजना काढायची आणि दलित बहिणीच्या ऑफिसची तोडफोड करायची हे चालतं का? राज्याला गृहमंत्री नाही , अर्थमंत्री नाही, तिघांच्या शपथविधीला करोडो रुपये खर्च केला. आज देशातल्या एकाच ऑफिसची तोडफोड झाली, ज्या ऑफिसची अध्यक्ष मी आहे , माझ्या फोटोवर त्यांनी काळी शाई फेकली , या सगळ्याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.