सगळेच राजकारणी दुधाने धुतलेले नसतात… गणेश नाईक स्पष्टच बोलले, म्हणाले तो दिवस माझ्या आयुष्यातील…

नवी मुंबईत घेतलेल्या जनता दरबारात बोलताना भाजप नेते गणेश नाईक यांनी प्रशासन आणि राजकारण्यांवर सडकून टीका केली आहे. "प्रत्येक खात्यात नालायकपणा आहे आणि सर्व राजकारणी काही शुद्ध दुधाने धुतलेले नाहीत," असे रोखठोक वक्तव्य नाईक यांनी केले.

सगळेच राजकारणी दुधाने धुतलेले नसतात... गणेश नाईक स्पष्टच बोलले, म्हणाले तो दिवस माझ्या आयुष्यातील...
ganesh naik
| Updated on: Jun 12, 2026 | 11:43 AM

“प्रशासनातील प्रत्येक खात्यात काही प्रमाणात नालायकपणा असतो आणि काही राजकारणीसुद्धा त्याला अपवाद नाहीत. सगळेच राजकारणी काही शुद्ध दुधासारखे पवित्र नसतात” असे खळबळजनक वक्तव्य भाजप नेते गणेश नाईक यांनी केले आहे. नवी मुंबईत आयोजित केलेल्या एका जनता दरबारात ते बोलत होते. यावेळी त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजावर आणि राजकीय व्यवस्थेवर थेट बोट ठेवले.

अधिकाऱ्यांचा सुस्तपणा कमी होतोय

गणेश नाईक यांनी नुकत्याच झालेल्या जनता दरबारात प्रशासनातील बदलत्या परिस्थितीचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, सध्या प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कामकाजात काही प्रमाणात सुधारणा होताना दिसत आहे. सर्व अधिकारी वर्ग आता चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. पूर्वीचा सुस्तपणा व आळशीपणा काही प्रमाणात कमी होत आहे. मात्र, अजूनही प्रत्येक खात्यात नालायकपणा शिल्लक आहे आणि राजकारणीही त्याला अपवाद नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने याची जाणीव ठेवून काम केले पाहिजे. दुसऱ्याला आनंद देण्यासाठी जगा, यातच खरा सुखाचा मार्ग आहे, असा सल्ला गणेश नाईक यांनी दिला.

…तो दिवस माझ्यासाठी आनंदाचा असेल!

यावेळी गणेश नाईक यांनी जनता दरबाराच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. मी हा जनता दरबार स्वतःच्या आनंदासाठी घेत नाही. समाजाच्या विविध स्तरांवर अतिशय दुःख आणि यातना आहेत. त्या यातनांना कुठेतरी मोकळीक मिळावी, लोकांना न्याय मिळावा यासाठी मी हा दरबार घेतो. ज्या दिवशी या जनता दरबारामध्ये आपल्या समस्या घेऊन एकही माणूस येणार नाही, तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस असेल,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

शेवटच्या माणसाला भेटेपर्यंत १२ ते १५ तास दरबार सुरू

गणेश नाईक यांचा जनता दरबार त्यांच्या प्रदीर्घ वेळेसाठी ओळखला जातो. याचा पुनरुच्चार करत ते म्हणाले की, “माझा जनता दरबार एकदा सुरू झाला की तो सलग १२ तास, १५ तास अगदी शेवटच्या माणसाला भेटण्यापर्यंत संपत नाही. शेवटच्या नागरिकाची समस्या ऐकून घेतल्याशिवाय मी थांबत नाही. जीवन जगताना आपण दुसऱ्याला आनंद देण्यासाठी जगले पाहिजे, यातच माणसाला खऱ्या सुखाचा मार्ग सापडतो, असा सल्लाही त्यांनी शेवटी सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना दिला. गणेश नाईक यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

Follow Us