‘उद्धव ठाकरे यांचं धर्मांतर, राजकीय लव्ह जिहाद…’ भाजप नेत्यांकडून कोंडी सुरूच

मालेगावातील उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी ऊर्दूतून लावलेले बॅनर्स चांगलेच चर्चेत आहेत. भाजप नेत्याने उद्धव ठाकरेंवर याच मुद्द्यावरून घणाघाती टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांचं धर्मांतर, राजकीय लव्ह जिहाद... भाजप नेत्यांकडून कोंडी सुरूच
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 28, 2023 | 9:06 AM

मुंबई : हिंदुत्व आणि सावरकरांच्या (Veer Savarkar) मुद्द्यावरून भाजपने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पूर्णपणे घेरलंय. आता तर एका भाजप नेत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका करत त्यांना कोंडीत पकडलंय. उद्धव ठाकरे यांचं राजकीय धर्मांतर झालंय, एवढच नव्हे तर त्यांचं लव्ह जिहाद झालंय, अशी टीका राणे यांनी केली आहे. महाविकास आघाडीत गेल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने हिंदुत्वापासून फारकत घेतल्याची टीका वारंवार होत असते. आता राहुल गांधींच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांची आणखी कोंडी केली जातेय.

नितेश राणे काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांनी नुकतीच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे सभा घेतली. सभेपूर्वी उद्धव ठाकरेंचे बॅनर जास्त चर्चेत राहिले. उद्धव ठाकरेंचे बॅनर्स ऊर्दू भाषेतून असल्याने त्यावरून जास्त टीका होतेय. यावरून नितेश राणे यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. ज्या माणसानं मुळातच इस्लाम धर्म स्वीकारला असेल. तो हिंदू धर्माबद्दल काय चांगलं बोलणार.
उद्धव ठाकरेंचा राजकीय लव्ह जिहाद झाला आहे.त्यांचं धर्मांतर झालं आहे. त्यामुळे त्यांना आता हिंदू धर्माबद्दल आस्था नाही, असा आरोप करत उद्धव ठाकरेंनी इस्लाम धर्म स्वीकारल्याचेही म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंची कोंडी वाढली

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात चांगलंच राजकारण पेटलंय. शिवसेनेची सावरकरांबाबतची भूमिका काँग्रेसच्या अगदी विरोधात असूनही महाविकास आघाडीत काँग्रेससोबत उद्धव ठाकरेंची शिवसेना बसते, यावरून भाजप आणि शिंदे सेनेनी त्यांची कोंडी सुरु केली आहे. आता तर भाजप-शिंदेसेनेचे नेते राज्यभरात सावरकरांवरील गौरव यात्रा हा कार्यक्रम नेणार आहेत. यावरून एककिडे राहुल गांधींवर तीव्र टीका तर उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केले जातील. उद्धव ठाकरे आता यातून काय मार्ग काढतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

शरद पवारांची मध्यस्थी?

तर नवी दिल्लीतदेखील सावरकरांच्या मुद्द्यावरून महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मध्यस्थीतून शिवसेना आणि काँग्रेसमधील वादावर तोडगा निघाल्याचं म्हटलं जातंय. तूर्तास तरी सावरकरांचा मुद्दा काँग्रेसकडून काढला जाणार नाही, अशी गळ शरद पवार यांनी घातल्याचं म्हटलं जातंय.  दिल्लीत झालेल्या या चर्चेची सविस्तर माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी वाचवण्यासाठी अखेर शरद पवार यांनी मध्यस्थी केल्याची चर्चा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us