Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांचा स्वभावच तसा ते नेहमीचं..त्यांना महायुतीचं काम करावचं लागेल, भाजप आमदाराची रोखठोक भूमिका
"शिवसेना संपवणं हे कुण्या पक्षाच्या हातात नाही, शिवसेनेने जो खड्डा खोदलेला आहे,उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेस सोबत गेले आणि त्याचा दुष्परिणाम लोकांना तो निर्णय आवडला नाही. त्यांचा पक्ष त्यांनीच संपवला" असं भाजपं आमदार बबनराव लोणीकर म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुतीने आज आपले उमेदवार जाहीर केले. महायुतीचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यात निवडणूक लढवण्यावर एकवाक्यात दिसत असली, तरी स्थानिक पातळीवर नाराजी, कुरबुरी कायम आहेत. त्यात छत्रपती संभाजी नगरमधून अब्दुल सत्तार यांच्या मुलाने विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. एकप्रकारे हे बंडाचं निशाण फडकवण्यासारखं आहे. त्यानंतर काल रात्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरमधील नेत्यांची तातडीची बैठक घेतली. अब्दुल सत्तारही या बैठकीला होते. एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तारांना युती धर्म पाळण्याची सूचना केली. त्यानुसार अब्दुल सत्तार यांनी माघार घेण्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान “अब्दुल सत्तार बंडखोरी करू शकणार नाही हे मी हजार टक्के सांगतो,ते फॉर्म मागे घेतील आणि त्यांना महायुतीचं काम करावंच लागेल” असं भाजपं आमदार बबनराव लोणीकर म्हणाले. “संभाजीनगर आणि जालन्यामध्ये भाजपचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळेच हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला सुटलेला आहे” असं लोणीकर यांनी सांगितलं. विधान परिषद निवडणुकीत महायुतीत झालेल्या बंडखोरीबद्दल बबनराव लोणीकर म्हणाले की, “पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी बसून या संदर्भात चर्चा केलेली होती. चर्चा केल्यानंतर तिन्ही पक्ष तयार झाले, ज्यांचं जास्त संख्याबळ त्याच्याकडे त्या जागा गेल्या”
मेरीट वर ही जागा भाजपला मिळाली
“संभाजीनगर आणि जालन्यामध्ये भाजपचे संख्याबळ जास्त आहे, शिवसेनेपेक्षा खूप जास्त आहे. त्याच्यामुळे हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला सुटलेला आहे, संख्याबळाच्या आधारावर मेरीट वर ही जागा भाजपला आलेली आहे” असं लोणीकर म्हणाले. “एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांना समज दिलेली आहे, एकदा निर्णय झाल्यानंतर अपक्ष फॉर्म भरणे म्हणजे ही बंडखोरी आहे.अब्दुल सत्तार यांचा स्वभावच तसा आहे ते नेहमीचं तसं करत असतात, काँग्रेसमध्ये असताना सुद्धा त्यावेळच्या सरकारच्या विरोधात ते सतत भूमिका घेत होते.सत्तार यांचा फॉर्म मागे घेण्यात येईल. त्या ठिकाणी बंडखोरी होणार नाही” असा विश्वास बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला.
जो काम करेल त्याच्या मागे लोक
“काहीतरी बोलायचं आणि बातमी करायची,लोक आता याकडे फार लक्ष देत नाहीत, जो काम करेल त्याच्या मागे लोक आहेत” असं म्हणत लोणीकरांनी सत्तार यांच्या विधानावर पलटवार केला.भारतीय जनता पक्ष 100% जिंकेल, महायुतीचे सर्व नेते एकत्र आहेत आम्ही सर्व एकत्र लढू असं ते म्हणाले.