एकनाथ शिंदेनी नगरसेवक हलवताच देवेंद्र फडणवीस मैदानात, महापौर कोणाचा? स्पष्टच सांगितलं

मुंबई महानगरपालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता महापौर कोणाचा होणार? नगरसेवकांच्या पळवापळवीच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली महत्त्वाची प्रतिक्रिया आणि महायुतीचा सत्तेचा फॉर्म्युला जाणून घ्या

एकनाथ शिंदेनी नगरसेवक हलवताच देवेंद्र फडणवीस मैदानात, महापौर कोणाचा? स्पष्टच सांगितलं
eknath shinde devendra fadnavis
| Updated on: Jan 18, 2026 | 12:19 PM

मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांपैकी महायुतीने ११८ जागा जिंकून बहुमताचा ११४ हा आकडा पार केला. आता मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या कुणाकडे राहणार? आता महापौर कोणाचा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः महापौरपदावरून महायुतीमधील घटक पक्षांमध्ये भाजप, शिवसेना-शिंदे गट आणि राष्ट्रवादी-अजित पवार गट यांच्यात छुपी स्पर्धा सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्याच आता मुंबईत नगरसेवकांच्या फोडाफोडीच्या राजकारण सुरु असल्याचे दिसत आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आमच्याकडे स्पष्ट बहुमत

मुंबई महापालिकेत निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये हलवल्यामुळे पळवापळवीच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही ज्याप्रमाणे आमच्या नगरसेवकांना एकत्र बोलावले, तसेच शिंदेंनीही केले असेल. मात्र, आता आम्हाला कोणत्याही पळवापळवीची आवश्यकता नाही. आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे आणि महायुती म्हणून आम्ही भक्कम आहोत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आता कुठेही पळवापळवी होणार नाही

महायुतीमधील तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून मुंबईच्या सत्तेचा फॉर्म्युला ठरवतील. यामध्ये केवळ महापौरपदच नाही, तर उपमहापौर आणि महत्त्वाच्या वैधानिक समित्यांचे स्थायी समिती, सुधार समिती इत्यादी अध्यक्षपद कोणाला द्यायचे, याचे गणित मांडले जाईल. आम्ही पोरखेळ होऊ देणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच आता कुठेही पळवापळवी होणार नाही, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.

सर्व निर्णय खेळीमेळीने घेऊ

शिंदे गटाकडून मुंबईत अडीच वर्षे महापौरपद मिळावे, अशी मागणी होत असल्याच्या चर्चा आहेत. यावर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे उत्तर दिले. मी आणि शिंदे साहेब एकत्र बसू आणि सर्व निर्णय खेळीमेळीने घेऊ, दोन्ही पक्षांमध्ये कोणतेही मतभेद होणार नाहीत आणि आम्ही मिळून मुंबईचा विकास करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई महानगरपालिका गेली अनेक दशके शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात होती. आता शिंदे गट आणि भाजपला एकत्र येऊन हे वर्चस्व मोडीत काढायचे आहे. अशा वेळी जर महायुतीतच फूट पडली, तर त्याचा फायदा विरोधकांना महाविकास आघाडी होऊ शकतो. ही जोखीम ओळखूनच फडणवीसांनी एकजुटीचा मंत्र दिला आहे.

Follow Us