एकही खोकेवाला निवडून येता कामा नये; संजय राऊत यांची विदर्भातील जनतेला हाक

शिवसेनेसाठी १०० दिवस काय, जन्मठेपही भोगायला तयार आहे, असंही ते म्हणाले.

एकही खोकेवाला निवडून येता कामा नये; संजय राऊत यांची विदर्भातील जनतेला हाक
संजय राऊत
Image Credit source: tv 9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Nov 26, 2022 | 6:31 PM

बुलडाणा – चिखली येथे शिवसेनेच्या ठाकरे गटानं सभा घेतली. या सभेत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, या पेटलेल्या मशाली गद्दारांचे खोके बेचिराख केल्याशिवाय राहणार नाही. बुलडाणा ही जिजाऊंची भूमी आहे. गद्दारांची भूमी उखळून फेकण्यासाठी या मशाली आल्यातं. एक फूल दोन, दोन हात. एक खासदार व दोन आमदार गेलेतं, अशी टीका त्यांनी केली. ४० आमदार हे गुवाहाटीला गेलेत. त्यामुळं महाराष्ट्रातील देवता संपलीत का, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. अरे, हा महाराष्ट्र संतांचा आहे. बाजूला शेगाव आहे. ज्ञानेश्वरांकडून रेड्यांना बोलायला लावले. आणि मुख्यमंत्री ४० रेड्यांना घेऊन गुवाहाटीला गेले. एकही खोकेवाला निवडून आला नाही पाहिजे, असं आवाहन संजय राऊत यांनी जनतेला केलं.

शिवसेनेसाठी १०० दिवस काय, जन्मठेपही भोगायला तयार आहे, असंही ते म्हणाले. एक संजय राऊत कुर्बान झाला तर काय अनेक संजय राऊत तयार आहेत. हे लाखो शिवसैनिक मोडून काढता येणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी दिला.

आजच्या दिवशी आपली घटना तयार झाली. पण, राज्य कायद्यानं चालत नाही. हे बेकायदेशीर सरकार आपल्या बोडक्यावर बसवले आहे. ते लवकरच जाणार, असं भाकित संजय राऊत यांनी केलं. जेलमध्ये जाताना सांगत होतो, शेवटपर्यंत हा भगवा माझ्या अंगावर राहील.

शिवसेनेचे २५ खासदार आणि किमान ११५ आमदार निवडून द्यायला हवेत. शिवसेनेचा स्वबळावर मुख्यमंत्री निर्माण करून या रेड्यांचा राजकीय बळी घेतला पाहिजे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

शिवसेना आता आधीपेक्षा जोमानं कामाला लागली आहे. बुलडाण्यात आलेले खोक्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी केली. ४० रेडे परत येतील. तेव्हा त्यांना जाब विचारला पाहिजे. ही घोडदौड आता थांबता कामा नये. अरे तुम्ही ४० फोडले असाल. पण, ४० लाख शिवसेनेबरोबर आहेत. शिवसेनेसाठी लढणारी ही फौज कुणाला विकत घेता येणार नाही, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us