‘राज्यपाल म्हणून आदर, पण तुमच्या काळ्या टोपीखाली जे दडलंय त्याचा मान ठेवूच शकत नाही’; उद्धव ठाकरे बरसले

| Updated on: Nov 26, 2022 | 7:21 PM

"तुमच्या काळ्या टोपीखाली जे काही दडलेलं आहे त्याचा मान मी राखू शकत नाही", असा घणाघात उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना उद्देशून केला.

राज्यपाल म्हणून आदर, पण तुमच्या काळ्या टोपीखाली जे दडलंय त्याचा मान ठेवूच शकत नाही; उद्धव ठाकरे बरसले
Follow us on

बुलढाणा : “मिंदे सरकारने राज्यपालांचा निषेध करण्याऐवजी त्यांची बॅग पॅक करून त्यांना पाठवून देण्याची हिंमत दाखवायला हवी होती. आम्ही ज्या त्वेषाने बोललो. त्या त्वेषाने बोलले का नाही? मी मुख्यमंत्री असताना राज्यपालांचा अगाऊपणा सहन करत नव्हतो. राज्यपाल म्हणून मी त्यांचा मान राखू शकतो. पण तुमच्या काळ्या टोपीखाली जे काही दडलेलं आहे त्याचा मान मी राखू शकत नाही”, असा घणाघात करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका ठणकावून सांगितली. ते बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका केली.

“तुम्ही महाराजांचा अवमान करत असाल तर तुमचं वय किती असेल तर तुम्ही घरात बसा. आम्ही सहन करणार नाही. महाराज जुने आदर्श कसे होऊ शकतात?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

“केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले गुजरातमध्ये दंगलखोरांना आम्ही धडा शिकवला. त्यानंतर एकही दंगल झाली नाही. पण ९२मध्ये बाबरी पडली. त्यानंतर जी दंगल झाली त्यावेळी तुम्ही बिळात पडत होता. तेव्हा शिवसेना उभी होती”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“अमरनाथ यात्रा शिवसेनेनेच सुरू केली. २००३ मध्ये तुम्ही धडा शिकवू शकलात ते जिजाऊच्या पोटी आमचं दैवत जन्माला आलं म्हणून. ते नसते तर तुमचं नावही भलतंच झालं असतं”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

“एक मंत्री अब्दुल गटार. आता मुद्दाम बोलतो. हे सोडून देण्याची वेळ नाही. खासदार सुप्रिया सुळेंवर टीका केली. टीका करू शकता पण शिव्या घालता. मी मुख्यमंत्री असतो तर ऐकून घेतलं नसतं. लाथ मारून हाकललं असतं. एकाला हाकललं तसं. तुम्ही वाघ आहात की गांडूळ आहात?”, असा सवाल त्यांनी केला.

“महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जातात तरी शेपट्या घालून. महाराष्ट्रातील जिल्हे मागतात तरी तुम्ही शेपट्या घालून बसला. महिलेवर अपमान होतो , तेव्हाही शेपूट घालून. महाराष्ट्रात जे चाललं ते पसंत नाही असं म्हणून आता सरकारमधून बाहेर पडा. हिंमत असेल तर जाहीर करा. आज शहीद दिन असताना तुम्ही गुवाहाटीला जाता”, अशी टीका त्यांनी केली.