औरंगाबाद: मराठवाड्याचा विकास सुसाट वेगाने सुरु आहे. आमच्या प्रयत्नांना यश आले तर औरंगाबाद-पुणे-नांदेड-हैदराबाद असा हा बुलेट ट्रेन (Bullet train) मार्ग होऊ शकतो, अशी शक्यता सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok chavan) यांनी व्यक्त केली. एवढंच नाही तर नांदेडला बुलेट ट्रेन बनवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना बोललो आहे. केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनाही बोललो आहे. तसेच बुलेट ट्रेनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधानांनाही पत्र लिहिलं आहे, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी औरंगाबादमध्ये बोलताना दिली. मुंबई- पुणे- नांदेड-हैदराबाद हा बुलेट ट्रे चा मार्ग प्रति तास 350 किलोमीटर वेगाने जाऊ शकतो, असेही अशोक चव्हाण म्हणाले. चव्हाणांच्या या वक्तव्यामुळे मराठवाड्याला बुलेट ट्रेनचाही अनुभव मिळणार, अशी आशा लोकांच्या मनात निर्माण होत आहे.
औंरगाबादमधील पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण म्हणाले, समृद्धी महामार्गाला मराठवाड्यातील अनेक जिल्हे जोडण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया मार्चपर्यंत पूर्ण होईल. नांदेड, जालना परभणी हिंगोली हे चार जिल्हे समृद्धी मार्गाला जोडणार आहे..
पत्रकार परिषदेत बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय तिथे एनडीआरएफच्या निकषानुसार नुकसान भरपाई देण्याचा निर्णय झाला आहे. अर्थसंकल्प तरतूद 1239 कोटींची कामे मंजूर करण्यात आली औरंगाबादच्या देखभालीसाठी 267 कोटीची मंजुरी देण्यात आली आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा, धार्मिक स्थळेही सुरु होत आहेत. 22 ऑक्टोबर पासून नाट्यगृह सुरु होणार असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.
राज्यात विविध ठिकाणी सुरु असलेल्या रस्ते दुरुस्तीसाठीही निधीची कमतरता भासणार नाही, असं आश्वासन अशोक चव्हाण यांनी दिलं. राज्यात 92 पूल आहेत. ज्या पुलाचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं, त्यांची दुरुस्ती करण्यात येईल. यासाठी 542 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या करिता एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.
केंद्र सरकारच्या पिकविमा योजनेवर अशोक चव्हाण यांनी ताशेरे ओढले.
पीकविमा योजनेचा अनुभव फारसा चांगला नाही, पीकविमा पंचनामे लवकर होत नाहीत. या कारणामुळे देशातल्या पाच राज्यांनी पीकविमा नको अशी भूमिका घेतली आहे. त्यात गुजरात हे ही एक राज्य आहे. या योजनेतील त्रुटींबाबत एक सर्वपक्षीय शिष्टमंडळसुद्धा पंतप्रधानांना भेटलं आहे, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. (Bullet train will run in Marathwada , Public Works Minister Ashok Chavan’s statement in Aurangabad)
इतर बातम्या-