चिकन आणि दही खाल्ल्याने मृत्यू होतो का? नाशिकच्या घटनेनंतर डॉक्टरांनी काय सांगितलं? तुम्हीही…
या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, नेमकी विषबाधा कशामुळे झाली, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

नाशिक जिल्ह्यातील एका गावात धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका वृद्ध दाम्पत्याने चिकन खाल्ल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. यात पत्नीचा रुग्णलयात दाखल करताच मृत्यू झाला तर पतीवर दवाखान्यात उपचार सुरु करण्यात आले असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. या प्रकरणात चिकन नंतर या दाम्पत्याने दही खाल्ल्याचे उघडकीस आले आहे. या संदर्भात विरुद्ध आहाराने विषबाधा झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र,या प्रकरणात डॉक्टरांनी नेमके काय सांगितले हे महत्वाचे आहे.
नाशिकच्या बागलाण तालुक्यातील आखतवाडे गावात विचित्र घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.या गावातील एका वृद्ध दाम्पत्य शांताराम ह्याळीज आणि द्वारकाबाई ह्याळीज यांनी रात्री बाहेरुन आणलेले चिकन खाल्ले आणि त्यानंतर त्यांना दही खाल्ले. त्यामुळे त्यांची तब्येत रात्री उशीरा बिघडली. यात द्वारकाबाई यांना उलट्या आणि जुलाब झाल्याने त्यांची तब्येत एकदम खालावली. त्यांचे पती शांताराम यांची देखील तब्येत ढासळली. त्यामुळे रात्री उशीरा त्यांच्या मुलांनी नाशिकच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी द्वारकाबाई यांना तपासून मृत घोषीत केले. तर शांताराम यांच्यावर व्हेटींलेटरवर उपचार सुरु आहेत.
शांताराम ह्याळीज यांना रात्री अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले. ते आले तेव्हा त्यांचे ऑक्सिजनचे प्रमाण केवळ ५५ टक्के होते. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांचा बीपी देखील कमी झाल्याने तो वाढवण्यासाठी औषधे दिली जात आहेत. त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे असे रुग्णालयाचे डॉ. निखिल निकम यांनी सांगितले.
डॉ. निकम पुढे म्हणाले, “नातेवाईकांकडून चिकनच्या जेवणानंतर दही खाल्ल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. चिकन आणि दही हा विरुद्ध आहार असला तरी त्यामुळे इतकी गंभीर विषबाधा होऊन जीवाला धोका निर्माण होऊ शकतो हे वैद्यकीय दृष्ट्या पटत नाही. त्यामुळे नेमके कारण काय आहे, याचा तपास होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मुलगा दीपक ह्याळीज म्हणाला, “चिकन आधी मी खाल्ले होते. जवळपास एक तासानंतर आई-वडिलांनी जेवण केले. त्यानंतर एक ते दीड तासात त्यांना त्रास सुरू झाला. मी आईलाही दवाखान्यात चल असे सांगितले होते, पण ती आली नाही.नंतर आईची देखील तब्येत खूप बिघडली आणि तिचा मृत्यू झाला. मी वडिलांना घेऊन दवाखान्यात गेलो. चिकनच्या भाजीनंतर त्यांनी दही आणि दूधही घेतले होते.”
तपासणी अहवाल आल्यानंतरच..
“जेवल्यानंतर त्यांना प्रचंड त्रास होऊ लागला. रुग्णालयात नेत असतानाच आईने प्राण सोडला. चिकन खाल्ल्यानंतर दही खाल्ल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे.” असे नातेवाईक योगेश सूर्यवंशी यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून शवविच्छेदनादरम्यान आवश्यक नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तपासणी अहवाल आल्यानंतरच विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.