Nashik | …मधाचं बोट कुणी चाखवा, मला लागलाय खोकला; निफाडचा पारा 10 अंश सेल्सिअसवर!

| Updated on: Dec 19, 2021 | 9:39 AM

नाशिक जिल्ह्यात एकीकडे नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली असताना दुसरीकडे प्रचारासाठी भिरभिर फिरणाऱ्या नेत्यांना हिव भरण्याची वेळ आलीय. अहो, निफाडचा पारा तर 10 अंश सेल्सिअसवर घसरलाय.

Nashik | ...मधाचं बोट कुणी चाखवा, मला लागलाय खोकला; निफाडचा पारा 10 अंश सेल्सिअसवर!
निफाड तालुक्यात पारा दहा अंशापर्यंत खाली घसरल्याने शेकोट्या पेटल्या आहेत.
Follow us on

नाशिकः नाशिककरांचे यंदा विचारूच नका. त्यांची अवस्था खरोखर कोंडीत सापडल्यासारखी झालीय. का, ते आता तुम्हीच जाणून घ्या…

आला थंडीचा महिना
झटपट शेकोटी पेटवा
मला लागलाय खोकला
मला लागलाय खोकला
मधाचं बोट कुणी चाखवा
मला लागलाय खोकला

दादा कोंडके यांच्या ह्योच नवरा पाहिजे या सिनेमातलं उषा मंगेशकर यांनी गायिलेलं आणि राम-लक्ष्मण यांनी संगीत दिलेलं हे गाणं आठवायचं कारण म्हणजे सध्या नाशिकमध्ये तरी जोरदार थंडीचा महिना आलाय बरं का. एकीकडे नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली असताना दुसरीकडे प्रचारासाठी भिरभिर फिरणाऱ्या नेत्यांना हिव भरण्याची वेळ आलीय. अहो, निफाडचा पारा तर 10 अंश सेल्सिअसवर घसरलाय. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात इतक्या कमी तापमानाची नोंद झालीय.

कुठे नफा, कुठे तोटा

वातावरणात दररोज बद्दल होत असल्याने उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे दहा अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद कुंदेवाडी येथे झाली आहे. हवेतील गारव्यामुळे निफाड, लासलगाव, पिंपळगाव बसवंत ,ओझर, सायखेडा ,चांदोरी गारठून निघाले आहे. या कडाक्याच्या थंडीने तालुका गारठला आहे. ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून नागरिक शेकत बसत आहेत.  थंडीमुळे गहू , हरभरा पिकांना फायदा होणार असला, तरी द्राक्षाच्या फुगवणीवर परिणाम होण्याच्या भीतीने द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

औरंगाबाद 12.8 अंशावर

औरंगाबादमध्येही तापमान कमालीचे घसरले आहे. काल शहराच्या किमान तापमानची 12.8 अंश अशी नोंद झाली. यापूर्वी 10 आणि 28 नोव्हेंबर रोजी औरंगाबादचे तापमान 12.7 अंशापर्यंत खाली घसरले होते. यंदा हवामान बदलाचा भयंकर फटका बसला. थंडीत ढगांनी गर्दी केल्यामुळे काही दिवसांपूर्वी पाऊस आणि गारठ्याचा संगम जुळून आला. आता शीतल वारे दाखल होत आहेत. त्यामुळे थंडीचा कडाका वाढणार आहे. मात्र, दुपारच्या सत्रात उकाडा आणि दमट हवामान जाणवू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

थंडीचा होणार का कहर?

यंदा पावसाने अक्षरशः थैमान घातले. नाशिकला तर झोडपून काढले. नांदगाव आणि मनमाडमध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांचे लाखो हेक्टरवरील पीक पाण्यात गेले. अगदी दिवाळीनंतरही पाऊस सुरू होता. ऐन साहित्य संमेलनाच्या पूर्वी एक दिवस अगोदर एक आणि दोन डिसेंबरला नाशिकला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे येणाऱ्या काळात थंडीचा असाच जोर वाढेल का, अशी शक्यता आहे. हवामान बदलाचे भयंकर परिणाम होत आहेत. त्यामुळे हवामान तज्ज्ञांनाही योग्य अंदाज बांधणे कठीण झाल्याचे दिसत आहे.

इतर बातम्याः

पीएफ संदर्भात महत्वाचा अलर्ट, डेडलाईन संपली तर होऊ शकते नुकसान, आळस झटका आणि वारसाचं नाव जोडा 

Bigg Boss Marathi 3 | Shocking! टिकटॉक स्टार सोनाली पाटील ‘बिग बॉस मराठी 3’मधून बाद?