Tukaram Mundhe News : तुकाराम मुंढेंना मोठा धक्का, 29 कर्मचाऱ्यांची थेट मंत्र्यांकडेच तक्रार; ‘त्या’ पत्रात काय ?

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाया सतत चर्चेत असतात. मात्र आता मुंढे यांच्यावर कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांनी नाराजी दर्शवली असून त्यांच्याविरोधात तक्रारीचे पत्र पाठवण्यात आलं आहे. काय आहे प्रकरण ?

Tukaram Mundhe News : तुकाराम मुंढेंना मोठा धक्का, 29 कर्मचाऱ्यांची थेट मंत्र्यांकडेच तक्रार; त्या पत्रात काय ?
तुकाराम मुंढेविरोधात नाराजी, थेट मंत्र्यांना लिहीलं पत्र
| Edited By: | Updated on: Jul 30, 2026 | 9:17 AM

राज्यात अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईचा धडाका सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त असलेल्या तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्याकडून राज्यभरातील अनेक रेस्टॉरंट, उपहारगृहे, डेअरींची तपासणी करून तिथे पुरेशी स्वच्छता नसे, नियमांचे पालन केले नसेल तर कारवाई करण्यात येत आहे. पण आता तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामागचं कारण म्हणजे, मुंढे यांच्याविरोधात आता 29 कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांनी तक्रार केली आहे. या कर्मचाऱ्यांनी थेट मंत्री नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांना पत्र लिहीलं असून त्यात तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत त्यांच्यावरोधात नाराजी व्यक्त केली आहे. या पत्राने मोठी खळबळ माजली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न व औषध प्रशासन (FDA) प्रयोगशाळेतील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रयोगशाळेचे सहसंचालक तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीविरोधात प्रयोगशाळेतील तब्बल 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. 15 जुलै रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनात कर्मचाऱ्यांनी अनेक गंभीर मुद्द्यांकडे लक्ष वेधलं . कामकाजाची नियमित वेळ असूनही अचानक दोन शिफ्टमध्ये काम सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांना सकाळी 9 वाजल्यापासून रात्री उशीरापर्यंत काम करावं लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच शनिवारची सुट्टी, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे असून, तसे या पत्रातही नमूद करण्यात आलं आहे. या निवेदनावर 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून त्यांनी आपल्या आक्षेपांची लेखी नोंद केली आहे.

काय आहेत आक्षेप ?

– प्रयोगशाळेत अचानक दोन शिफ्टमध्ये कामकाज सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या निर्णयासाठी आवश्यक मनुष्यबळ, तांत्रिक सुविधा आणि संसाधने उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही. त्यामुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असून त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे.

– प्रयोगशाळेत उपलब्ध कर्मचाऱ्यांकडून सकाळी 9 ते रात्री उशीरापर्यंत वाढीव वेळ काम करून घेतलं जातं, असा आरोप आहे. तसेच शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही काम करण्याचे आदेश दिल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

– अन्न, औषध आणि सौंदर्यप्रसाधनांचे प्रलंबित नमुने लवकर निकाली काढण्यासाठी घाई केली जात असल्याने विश्लेषणाच्या गुणवत्तेशी तडजोड होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

– एका विश्लेषकाकडून दरमहा ठरावीक मर्यादेपर्यंतच नमुन्यांचे अचूक विश्लेषण होऊ शकते. मात्र, त्यापेक्षा अधिक नमुने तपासण्याचा दबाव टाकला जात असल्याने विश्लेषणाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

प्रमुख मागण्या काय ?

1) शासन निर्णयानुसार पूर्ववत कार्यालयीन वेळ लागू करावी.

2) दोन शिफ्टची कार्यपद्धती तात्काळ रद्द करावी.

3) इतर शासकीय कार्यालयांप्रमाणे शनिवार-रविवारच्या शासकीय सुट्ट्यांचा लाभ द्यावा.

4) रिक्त पदे भरून पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे आणि अतिरिक्त कामाची दखल घ्यावी.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us